! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 24 July 2016

राधांनगरी धरण कोल्हापूर

राधानगरी (दाजीपूर) धरण (Kolhapur)

निसर्गाच्या विलक्षण हिरव्या रंगाच्या अनेक तऱ्हा पाहत, निरनिराळ्या फुलांचा नजरा बघत, वन्य प्राण्यांचा अधिवास बघत, त्यांची कधी चाहूल घेत तर क्वचित दर्शनाची इच्छा करत घनदाट जंगलातल्या पायवाटेने चालत जाणं ह्यासारखं रोमांचक क्वचितच दुसरं काही असेल. हा आणि ह्याबरोबर इतरही काही विशेष अनुभव घेण्यासाठी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्याला नक्कीच भेट द्यायला हवी.
राधानगरी वन्यजीव अभयारण्याला महाराष्ट्र सरकारने १९८५ साली मान्यता दिली. आणि हे पर्यटकांचे पश्चिम घाटातले अतिशय आवडते ठिकाण बनले ते इथे असणाऱ्या जैव विविधतेमुळे. दाजीपूर अभयारण्य म्हणूनही ओळखला जाणारा हा भाग पूर्वी कोल्हापूरच्या मराठ्यांसाठी खाजगी शिकारीसाठी राखीव होता. ३५१.१६ चौ. किलोमीटरवर पसरलेला हा भाग इथल्या सौंदर्य आणि आकर्षकतेमुळे अरण्यप्रेमींना आकर्षित करतो. प्रामुख्याने गवा हा इथला बघण्यासारखा प्राणी आहे. आणि इतर मुद्दाम पाहण्याजोग्या प्राण्यांमध्ये वाघ, चित्ते, आळशी अस्वले, शेकरू, रामगायी, भेकर इ. या प्राण्यांचा अधिवास असणारी वनस्पतींची विविधता ही इथल्या भूस्तरीय विविधतेमुळे आहे.
डांग आणि सडा हे इथल्या अभयारण्यातील वैशिष्ट्यपूर्ण अधिवास आहेत. जंगलाच्या अतिशय घनदाट, सदाहरित प्रदेशांमुळे इथे निसर्गाचा अद्भुत आविष्कार बघायला मिळतो. ह्याला स्थानिक भाषेत डांग किंवा राई असं म्हणतात. राई किंवा देवराई म्हणजे जंगलाचा काही ठराविक राखून ठेवलेला भाग. हा भाग गावकऱ्यांनी अगदी पूर्वीपासून सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांसाठी राखून ठेवलेला असतो. बारमाही आणि पावसाळ्यात वाहणारे पाण्याचे असंख्य प्रवाह इथे जागोजागी वाहत असतात. ते वाहत वाहत पाणलोट क्षेत्राकडे जातात व त्यांच्यामुळेच इथे भोगावती नदीवरचे राधानगरी व दूधगंगा नदीवरचे काळम्मावाडी अशी दोन धरणे आहेत. पाण्याचे हे दोन साठे आणि त्यांच्या बाजूचा वनाचा परिसर यांनी प्राणी, पक्षी, कीटक आणि सरपटणारे प्राणी या सर्वांना ह्या अभयारण्यात आपली वसतिस्थाने मिळवून दिली आहेत.
हे अभयारण्य म्हणजे अनेक वन्य प्राण्यांचे जणू घरच आहे. त्यात सस्तन प्राण्यांच्या ४७, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ५९, उभयचर प्राण्यांच्या २०, पक्ष्यांच्या २६४ आणि फुलपाखरांच्या ६६ प्रजाती इथे बघायला मिळतात. हे जंगल गोवा व कर्नाटकच्या संरक्षित भागाला अगदी लागून आहे. या तिन्ही राज्यांतला अभयारण्याचा परिसर लाभल्यामुळे सह्याद्रीतील वाघांचा वावरही येथे आढळतो. राजर्षी शाहू सागर आणि उद्यान, लक्ष्मी सागर, उगवाई देवी, महादेव मंदिर, शिवगड, झांजूचे पाणी, हाडकेची सरी, लक्ष्मी तलाव, कोकण दर्शन, सावराई सडा, काळम्मा मंदिर, इदरगंज पठार तसेच दाजीपूर आणि राधानगरीचे पर्यावरण माहिती केंद्र इथे पर्यटक नेहमी भेट देतात.
हे अभयारण्य म्हणजे ट्रेकर्ससाठी जणू नंदनवनच आहे. दाजीपूरहून सारवाई सड्याला जाणारा रस्ता पर्यटकांना रमणीय निसर्गाने नटलेल्या, जैव विविधतेने समृद्ध अशा भागात घेऊन जातो. इथून ट्रेकिंगच्या खूप वाटा जातात. राकासाई मंदिर ते राजापूर, फराळे-सुरंगी गेट ते दाजीपूर, ठक्याचा वाडा ते मानबेट-बोरबेट, उगवाई देवी ते फोंडा घाट पॉईंट, फोंडा घाट पॉईंट ते शिवगड, झुंजूचे पाणी ते हाडकेची सरी, वाघाचे पाणी ते लक्ष्मी पॉईंट, लक्ष्मी पॉईंट ते जळवाचे पाणी. ट्रेकर्सना इथे येताना रीतसर परवानगी घ्यावी लागते तसेच स्थानिक वाटाड्या सोबत घेणे बंधनकारक आहे. बहुतेक वेळेला ग्राम निसर्ग संवर्धन समितीचा सदस्य सोबत असतो.
मुंबईपासून अंतर ४४० किलोमीटर
कसे जाल?
विमान
पुणे हे जवळचे विमानतळ
रेल्वे
जवळचे रेल्वेस्टेशन कोल्हापूर.
रस्ता
कोल्हापूर हे सर्व मोठ्या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. राज्य परिवहनाच्या आणि खाजगी बसेस कोल्हापूरला सतत ये जा करत असतात. कोल्हापूरहून राधानगरीला राज्य परिवहनाच्या बसेस आहेत

No comments:

Post a Comment