प्रबळगड आणि कलावंती दुर्ग बघितला आहे किवा पाहायचा आहे अशा हौशी पर्यटक मित्रांना, हा ट्रेक आणि निसर्ग सौंदर्यपूर्ण परिसर कसा अनुभवायचा? याच्याबद्दल माझे स्थानिक मत..
तुम्ही दीड तास पायपिट करून प्रबळ माची या गावामध्ये पोहचत. त्यावेळी तुम्ही खूप दमलेले असतात. मग कलावंतीण किवा प्रबळगडामधील एखादे ठिकाण बघून तुम्ही परत जातात. पण जर कलावंतीण तसेच प्रबळगड आणि आजूबाजूचा स्थानिक परिसर जर पूर्णपणेअनुभवायचा असेल तर मी एक स्थानिक म्हणून मार्गदर्शन नक्कीच देईन. तुम्ही एक रात्र गावामध्ये राहा. सकाळी माची गावामध्ये पोहचल्यावर चहा नास्ता करून कलावंतीण दुर्ग पाहायला जा आणि पुन्हा गावामध्ये आल्यावर गावाच्या उजवीकडे असणारे शिवशंकराचे मंदिर पाहू शकतात. गावाच्या कड्यावरून दिसणारा सुर्यास्त हे तर अदभूतपूर्व दृश्य आहे हे अनुभवा, संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पायखाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि त्यावर चमचमणा-या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. त्या सारखा आनंद जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स देऊ शकणार नाही. विशेषकरून गावाच्या कड्यावरून रात्री लग्नसराईच्या लाईटिंगच्या प्रमाणे चमकणारे मुंबई शहर, रसायनी, पनवेल आणि आजुबजुचा प्रदेश कसा नटलेला दिसतो. त्यामुळे असा भास होतो कि शाही लग्नाचा समारंभ आहे, संध्याकाळचा हाडं गोठवणारा गारठा, रानवारा. मग याच्यापुढे एसी नक्कीच फिक्का पडेल. पावसात कड्यावरून समुद्राकडे घाई-घाईने वाट काढत जाणारे धोधो कोसळणारे धबधबे, शिवाय दुसऱ्या दिवशी प्रबळगड ट्रेकला जा. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेशमंदिर आहे. तसेच चार पाच पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. प्रबळगडावर अनेक बुरुज आहेत. तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारखी ठिकाणी आहेत, काळ्याभूरुजावर एक मोठा चुन्याचा ढीग आहे. हा चुन्याचा ढीग भूरुज बांधण्यासाठी पूर्वी वापर करण्यात आला असेल असे वाटते. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट जंगल असल्याने हे सगळे बघणे वाटाड्याची गरज भासते. गडावरून माथेरान, मोरबे धरण, तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारख्या ठिकाणाचे विविध पाँईंटस् फार सुंदर दिसतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड,कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. हे सगळे पाहून झाल्यावर पुन्हा माचीगावात येऊन थोडा आराम करून संध्याकाळची बस पकडून परतीचा मार्ग धरावा. यामुळे तुमचा प्रबळगड आणि कलावंतीण ट्रेक तर होईलच पण आजूबाजूचा निसर्ग परिसराचा आनंद पण मिळेल. त्यामुळे ट्रेकच्या निमिताने एक पिकनिक चा अनुभव नक्कीच येईल
गडावर पोहचायचे कसे..
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे जुन्या नॅशनल हायवेवर शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कलंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे जुना हायवे जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो. शिवाय पनवेल वरुण (गांधी हॉस्पिटल) जवळ सहा आसनी मिनीडोर (टमटम) रिक्षा भाड्याने करुन ठाकुरवाडी गावामध्ये उतरावे. १० लोकांचे साधारणतः 200 -250 रुपये द्यावे लागतात.आणि दुसरा उपाय म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे . प्रत्येक व्यक्ति मागे 12 रुपये बसचे टिकीट आहे .ठाकुरवाडी पर्यंत आल्यावर तेथून तुमची प्रबल गडाकडे जाण्यासाठी पायी यात्रा सुरु करावी लागते.
प्रबळगड इतिहास..
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले. मुरंजन.बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.
कलावंतीण दुर्ग इतिहास.
हा दुर्ग मुंबई पुणे हायवेवरुन सहजपणे दिसतो. कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्यावर महल बांधला होता. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढ़ण्याकरिता खडक कापून पाय-या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नुर्त्य करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
तुमच्या प्रतिक्रियेची गरज :-
माझे नाव निलेश भुतांब्रे, प्रबळगडाच्या पायथ्याशी माझे गाव वसलेले आहे. शिक्षण क्षेत्रात पदवी घेणारा माझ्या गावामधून मी एकमेव आदिवासी मुलगा. हे गाव प्रबळगडाच्या ऐतिहासिक क्षेत्रात तर येतेच व निसर्ग सौंदर्यपूर्ण आहे. गावाच्या वरच्या बाजूला प्रबळगड व त्याला लागुन कलावंती दुर्ग आणि आजूबाजूचा नैसर्गिक परिसर, विशेष करून या स्थानाकडे पर्यटकांचा वाढता कल आहे. त्याच बरोबर पर्यटकांची होणारी गैरसोय. हे सर्व बघायचे, आनुभवायचे तर दोन दिवस पाहिजे. मग रहायचे कुठे? खायचे काय? हे प्रश्नआहेतच. मग यावर उपाय म्हणून काही पर्यटक गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गवातामध्ये राहतात, काही तरी खाऊन कशीबशी रात्र काढतात? नाहीतर एका दिवसामध्ये कोणते तरी एक ठिकाण पाहून घरी जायचे हे पक्के. रात्री गावामध्ये रहाणारे ग्रुप बघितले तर ते फ़क्त पुरुषवर्गांचेच? फॅमिली व महिला असणारे ग्रुप फ़क्त दिवासाच पाहायला मिळतात. याचे कारण काय ? याचे कारण एकच की रात्री गावामध्ये राहाण्याची, खाण्याची-पिण्याची होणारी गैरसोय ? हा ऐतिहासिक भाग पूर्ण न करता तेथील आजूबाजूचा नैसर्गिक परिसराचा अनुभव घेण्याकरिता, नुसती पुरुषी पिकनिक न करता, फॅमिली, लेडीस, जेन्ट्स ग्रुप पिकनिक करण्याकरीता व रात्री गावामध्ये राहाण्या, खाण्याची-पिण्याची होणारी "गैरसोय" दूर करण्याकरिता.. पर्यटकांची पायपिट दूर करण्याकरिता... या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी गावामध्ये दोन दिवस व एक रात्र असे मिळून ट्रेकिंग व सहल प्याकज पुरवत आहोत तसेच हॉटेल आणि लॉगिंग सेवा पुरवत आहे. यासाठी मला तुमच्या मार्गदर्शनाची आणि तुमच्या प्रतिक्रियेची गरज आहे. त्यामुळे मी पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार चांगली सेवा देऊ शकेन. मी तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघेन तसेच प्रस्ताव, सम्मोहन, संकेत पाठवण्याची कृपा करावी..
No comments:
Post a Comment