महाराष्ट्रातील जवळजवळ सगळेच समुद्रकिनारे हे सुंदर, शांत,
स्वच्छ, आणि निसर्ग रमणीय आहेत. गुहागरचा समुद्रकिनारा सुद्धा याला अपवाद नाही.
खरंतर गुहागर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे वैभवच म्हणावे लागेल. वासिष्ठी आणि जयगड
खाड्यांच्या मध्ये वसलेले गुहागर हे अत्यंत टुमदार असे छोटेसे गाव असून त्याला
लाभलेला सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे इथे वारंवार यावेसे
वाटणारे आकर्षण नक्कीच आहे.
गुहागरचा पेशवे घराण्याशी फार पूर्वीपासून संबंध आलेला आहे. थोरले माधवराव पेशव्यांचे काका राघोबादादा यांची पत्नी आनंदीबाईचे माहेर या गुहागरचेच. इथून १५ कि.मी. वर असलेल्या कोतुळक या गावी असलेल्या ओक घराण्यात आनंदीबाईचा जन्म झाला होता.
दगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे नुकताच जीर्णोद्धार झालेले दुर्गादेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्चिम दिशेला केलेले आढळते.
मुंबईपासून अंतर २८० कि.मी.
कसे जावे ?
विमान
जवळचा विमानतळ मुंबई इथे आहे.
रेल्वे
जवळचे रेल्वे स्थानक हे कोंकण रेल्वेवरील चिपळूण हे आहे.
रस्ते
गुहागर हे चिपळूण, रत्नागिरी, पुणे आणि मुंबईशी रस्त्याने जोडले गेलेले आहे. या सर्व गावातून गुहागरला जाण्यासाठी परिवहनाच्या बसेस उपलब्ध असतात.