महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान असणारा पन्हाळा,थंड हवेचे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय आहे .इ.स.१२व्या शतकात कोल्हापूर इथे राज्य करणाऱ्या शिलाहार राजांनी या किल्ल्याची उभारणी केली.त्यानंतर देवगिरीचे यादव, बहामनी, आदिलशाही आणि अखेरीस मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आला.
इ.स.च्या १७व्या शतकापासून ते १८व्या शतकापर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या अधिपत्याखाली राहिला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी या किल्ल्यावर बराच काळ व्यतीत केला होता. महाराणी ताराराणी यांनी करवीर किंवा कोल्हापूर संस्थानाच्या पन्हाळा गादीची स्थापना केली.
कोल्हापूरपासून 20 कि.मी. वर असणारा हा दुर्ग अनेक राजकीय घडामोडी आणि युद्धांचा साक्षीदार आहे. कोकण व उर्वरित महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील खिंडीचा नयनरम्य देखावा पन्हाळा येथून फारच छान दिसतो.
किल्ल्यावर वास्तूंचे अनेक अवशेष असून त्यांची देखभाल भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत केली जाते. किल्ल्याला वर्षभर कधीही भेट देऊ शकतो पण पावसामुळे खुलणारी दाट हिरवाई आणि दाट धुक्यामुळे निर्माण होणारे गूढ, रोमांचक वातावरण अनुभवण्यासाठी पावसाळ्यात नक्कीच भेट द्यायला हवी. पन्हाळा येथे अनेक हॉटेल्स आहेत. तेथे अस्सल कोल्हापुरी जेवणाची उत्तम सोय होऊ शकते.
पन्हाळ्यावर प्रवेश करताच आपण वीर शिवा काशीद यांच्या समाधीपाशी येतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच त्यांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केल्यास आपण पराशर गुंफेजवळ येऊन पोहोचतो. ही बौद्ध गुंफा आहे. पुढे लागणाऱ्या भव्य चौकात वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा दिसतो. येथून एक रस्ता तीन मजली अंधारबाव, तीन दरवाजा आणि तटबंदीला लागून असणाऱ्या कोकण दरवाजाकडे जातो. दुसरा रस्ता इब्राहिम आदिलशहा याने गडाच्या खालील भागावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या सज्जा कोठी या इमारतीकडे जातो. तिसरा रस्ता सोमेश्वर किंवा सोमाळे तलावाकडे जातो. या तळ्याचा उल्लेख करवीर माहात्म्य या मध्ययुगीन ग्रंथात आढळतो. गडाच्या मध्यावर अंबारखाना किंवा धान्यकोठार आहे. विजापूर शैलीत बांधलेल्या ह्या तीन इमारती आहेत. त्याव्यतिरिक्त नायकिणीचा सज्जा, धर्मकोठी, वाघ दरवाजा आणि राजदिंडी ही ठिकाणेही पाहायलाच हवीत. संभाजीराजांचे स्मारक, अंबाबाई, महाकाली आणि सोमेश्वर ही मंदिरे तसेच संभाजीराजे (द्वितीय) यांच्या पत्नी जिजाबाई यांची समाधी, रामचंद्रपंत अमात्य आणि प्रसिद्ध कवी मोरोपंत यांच्याही समाध्या आहेत.
मुंबईपासून अंतर :३७४ कि.मी.
कसे जाल?
विमान
सर्वात जवळचा विमानतळ पुणे येथे आहे.कोल्हापूर येथे देशांतर्गत विमान वाहतुकीचा (domestic) विमानतळ आहे मात्र इथे नियमित उड्डाणे नसतात.
रेल्वे
सर्व मोठ्या शहरांशी कोल्हापूर उत्तमप्रकारे जोडलेले आहे. मिरज हे मोठे रेल्वे जंक्शन कोल्हापूरपासून एका तासाच्या अंतरावर आहे.
रस्ता
सर्व मोठ्या शहरांशी कोल्हापूर उत्तमप्रकारे जोडलेले आहे.पुणे-बेंगळूरू महामार्गावरच कोल्हापूर शहर आहे. कोल्हापूरला जाण्यासाठी राज्यमार्ग परिवहन म्हणजेच एस.टी.बसेस तसेच खासगी बसेसची सेवा नियमितपणे उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment