! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 1 October 2018

भंडारदरा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले साहसी पर्यटक व ट्रेकर्सना साद घालणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे भंडारदरा. सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई येथेच आहे. प्रवरा नदी अडवून येथे भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे. 

धरणांचे दुरपर्यत पसरलेले पाणी पाहण्याचा आनंद अवर्णनीयच. येथील विल्सन धरण प्रेक्षकांचे आकर्षण आहे. धरणाच्या पायथ्याशी छानशी बाग आहे. येथे एका मोठ्या खडकावरून धरणाचे पाणी सोडले जाते. 

SJतेथून कोसळताना त्याचे तुषार अंगावर घेण्याचा आनंदही काही और आहे. कळसूबाई पर्वताचे विशाल रूप आपल्याला कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्राप्रमाणे बघायचे असल्यास भंडारदरयाला यायलासं हवे. विल्सन धरणाच्या पाण्यात कळसूबाईचे प्रतिबिंब पाहून चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात. 

शिवकाळात शत्रूपासून स्वराज्याचे संरक्षण करून आगाऊ सूचना देण्यासाठी टेहळणी मनोरयाचे काम करायचे ते कळसूबाई शिखर. सह्याद्रीच्या पर्वरांगात निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे भटकायचे झाल्यास भंडारदरा आदर्श ठिकाण आहे. 

याच परिसरात असलेला रतनगड ट्रेकर्ससाठी आव्हान आहे. जवळच असलेला रंधा फॉल तब्बल 45 मीटर उंचीवरून खाली कोसळतो. तो पाहणे हाही एका आनंददायी अनुभव ठरावा. येथील पर्वत रांगामधून शांतपणे प्रवरा नदी शांतपणे वाहते. 

येथे अगस्ती ऋषींचा आश्रमही आहे. प्रभू रामचंद्रांना अगस्ती ऋषी येथेच भेटले असल्याचे संदर्भ आहेत. भंडारदर्‍यास भेट देण्यासाठी हिवाळा हा चांगला मोसम आहे. या परिसरातील पाऊस अनुभवणे हाही एक आनंददायी भाग आहे. 

जाण्याचा मार्ग : 

मुंबईपासून भंडारदर्‍याचे अंतर आहे साधारणत 185 किलोमीटर. रेल्वेने जायचे झाल्यास मध्य रेल्वेवरील इगतपुरीला उतरायचे. इगतपूरीहून भंडारदरा 40 किलोमीटरवर आहे. पुणेकरांना जायचे झाल्यास रस्त्याने अंतर आहे साधारणता 200 किलोमीटर. 

Wednesday, 13 June 2018

बहिर्जी नाईक


मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.

दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्र्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले.

बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशयजरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते.

शिवाजीच्‍या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणार्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्‍यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचे. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असे म्हटले जाते की, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची.

बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. श्त्रूरुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहिती ते ठेवत.

शिवाजी राजे व संभाजी जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यांत लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले.

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाचा बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इथंभूत माहिती महाराजांना दिली होती. बर्‍याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करून पाऊल टाकत. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.

सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्डन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले.. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले.. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अश्या रीतीने बहिर्जी नाइकांबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत.

महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धान्त मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान-मंत्रिपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धान्त कौटिल्य मांडतो.

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्याद्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेरव्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्‍न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.

बहिर्जी नाईक यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. शिवाजीराजांनी अठरापगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणार्‍यास शिवरायांनी इनाम जाहीर केले, तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित.

स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजलखानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजलखानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजलखान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदल, हत्ती, तोफा-दारूगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली.

इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजांस जीवे मारण्याचा आहे असा नि:संदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.

पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू आणि शिवा काशीदकडे जाते तसेच ते बहिर्जी यांच्याकडे देखील जाते. शाहिस्तेखान प्रसंगातदेखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदा. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे (हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐन वेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती.). तसेच रमझानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादी तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करायची योजना आखली आणि ती यशस्वी केली. (राजे सहिष्णू वृत्तीचे होते पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी ‘रमझान महिना’ संपण्याची वाट पाहिली नाही.).

शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे २०००० सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता.

तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मोगलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले.

बहिर्जी नाईक भिकार्‍याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच, संपत्तीच्या ठावठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार ) जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटीदरम्यान दानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ तीन दिवसांत सुरत मोहीम यशस्वी केली त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे.

Saturday, 9 June 2018

## कोंडाजी फर्जंद एक ऐतिहासिक मावळा ##

## कोंडाजी फर्जंद एक ऐतिहासिक मावळा ##
काल फर्जंद हा चित्रपट आम्ही पाहिला तेव्हा असे लक्षात आले की शिवाजी महाराजांच्या शब्दांना किती किंमत होती त्याकाळी कोंडाजी फर्जंद ,गुंडाजी ,गुणोजी , आणि बहिर्जी नाईक यांनी आपल्या जीवाची शर्त करून किल्ले पन्हाळा स्वराज्यात सामील केला .
!!अशा ऐतिहासिक मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा !!

Monday, 30 April 2018

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन! माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन! तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन! आणि … पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩

Monday, 2 April 2018

३ april

मराठ्यांच्या राजे छञपति शिवाजी
महाराज यांनात्याच्यां स्मुतिदिनी
विनाम्र अभिवादन आणि
कोटि कोटि प्रणाम
  ।।जय जिजाऊ, जय शिवराय।।
# ३ april 1960

३ एप्रिल १६८०.ही तारीख

           ३ एप्रिल १६८०.ही तारीख काही इतर तारखे सारखी सामान्य नव्हे !अगदी मोजक्या असामान्य तारखांपैकीही ती नव्हे ! ती त्याहूनही खास आहे !तिचा महिमा अपरंपार आहे , ती तारिख म्हणजे ,"महाराष्ट्राच्या कातळ काळजाच्या शाईने  सार्वभौम काळाच्या ललाटावर कोरला  गेलेला अमीट शिलालेख आहे तो !.....
             .विशाल  सह्याद्रीचे भाळ म्हणजे किल्ले रायगड ! त्या भाळाचे कुंकमतिलक म्हणजे  स्वराज्य !अन् लालबुंद कुंकूमभरल्या भाळाचे सौभाग्य म्हणजे 'शिवराय' !!"अवघ्या अर्धशकाच्या काळात बालपणातले काही वर्षे सोडली ;तर स्वराज्याचा वेल लावणे,तो रूजवणे, वाढवणे श्वापदापासून संरक्षिणे ,त्याची फळे मुक्तहस्ते वाटणे,हे केवढे दिव्य  ! स्वराज्य मोडून पडले ,राजा नसला,कितीही विपरित परिस्थिती आली तरी स्वराज्याची उर्मी मनामनात तेवत ठेवणार्ं फिनिक्स पक्षाचं वेड ,महाराजांनी या सह्याद्रीच्या कुशीत पेरलं ; हे महाराजांचं सर्वात अलौकीक काम आहे ....तीस पस्तीस वर्षात अवघ्या जगताच्या कॅनव्हॉन्सवर आपल्या अविश्वसनिय कर्तृत्त्वाचे चित्र रेखाटून शिवराय आजरामर ठरले !यावश्चंद्रदिवाकरो किर्ती करून पुढच्या पिढ्यांसाठी अपार अभिमान मागे ठेवून शिवराय परलोकी गेले .स्वराज्याच्या अन् लौकिकाच्या एेन तारूण्यातल्या दुपारी ,१२ वाजता सूर्य आपले तेजाळ प्रभामंडळ सह्याद्रीवर रोखूण कुणाचीतरी वाट पहात होता... मलूल झालेला रायगड उन्हाळ्याच्या वणव्यात अनामिक  दीवाभितीच्या सावलीला निपचित पडला होता.अलिकडंच अस्सल नागानं  कात टाकून सळसळावं तसं सळसळणारं रायगडाचं सळसळत'ं रुधिर 'भर उन्हाळ्यातही थिजून गलितगात्र झालं होतं ...नगारखान्याचं वाजनं चमत्कारिक वाटतं होतं ,गेले दोन पाच दिवस ..त्या टिपरातून पडणारा ठोका फक्त भैरवीचा नाद का  आळवित होता ... हे रांगड्या रायगडावरच्या भाबड्या मावळ्यांना उमगत नव्हतं !उमगलं तेव्हा उशीर झाला होता.लवकर उमगून तरी काळजीपलिकडं काय केलं असतं त्यांनी ? एरवी निर्गुण अन् निराकार जगदिश्वराला कधी नव्हे तो उमाळा दाटून आला होता .....पण प्रभू जगदीश्वराचा उमाळा मंदिराच्या चिरेबंदित विरुण गेला .. स्वराज्याचं ऊर्जस्वल सत्त्व कातळ कड्यावरून  आकाशी झेपावलं !काळाची टीकटीक १२ वर येतीच निमिषभर स्तब्ध झाली पण.....ती थांबत नसते ,कशानेही,कुणासाठीही निमिशमात्रदेखिल ! पुढच्या ठोक्यासाठी कालपुरुषाने पाऊल उचललं ! अन् सह्याद्रीचे सौभाग्य आकाशाच्या निर्वात पोकळीत अनंताच्या प्रवासाला निघाले ....महाराज निघाले !

शंभुराजे पोरके झाले ,स्वराज्य ओकंबोकं दिसू लागलं ! रयतेचा वाली गेला अन् रयत हवालदिल झाली...प्रत्येक गडावर चिरान् चिरा ...पायवाटेच्या धुळीतला कण अन् कण शहारला......     सजीवाचा प्राण अन् चैतन्य निर्जिव पत्थरावर उदाशी पांघरुन अनंतात विलिन झालं
......
  ३एप्रिल १६८० शनिवार ...
शिवराय गेले...
विचार,आचाराची अन् सत्वशिलतेची विचारधारा मागे ठेवून गेले ......त्या रूपाने ते चिरंजिव ठरले !आपल्या आवतीभोवती आजही आहेत पण लौकिकासाठी आदरांजली अर्पण करु या.
   
     शिवरायांच्या पावण स्मृतीस शतश: मुजरा !

Monday, 5 March 2018

*रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा*

👱"तुमच्या चेहर्‍याला रंग लावण्यास मी आज तुमच्यापर्यंत पोहचु शकत नाही",..👏
"पण मी ईश्वराकडे प्रार्थना करते की",.
"तुमचे आयुष्य सुखाच्या वेगवेगळ्या रंगानी भरून जाऊ दे".

  🙏🏻 *रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🏻
🙏🚩

Saturday, 3 March 2018

शिवगर्जना

आस्तेकदम...
आस्तेकदम...
आस्तेकदम...
महाराज.....
गडपती...
गजपती...
भूपती..
अष्टावधानजागृत..
अष्टप्रधानवेष्टित..
न्यायालंकारभूषित..
शस्त्रास्त्रशासत्रपारंगत..
राजश्रियाविराजित.
सकळकुळमंडळीत..
राजनीतीधुरंधर.
प्रौढप्रतापपुरंदर.
क्षत्रियकुलावतंस..
सिंहासनाधीश्वर..
महाराजाधिराज....
राजा शिवछत्रपती महाराज की जय

Sunday, 25 February 2018

शिवाजी महाराज व त्यांच्या आई..

शिवाजी महाराज व त्यांच्या आई....
वाचा.....डोळ्यात पाणी येईल..लाईक नाही केले तरी चालेल पण मित्रांनो एकदा वाचा

राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे लक्ष आईसाहेबांकडे पूर्ण होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व. महाराजांचे दैवत. गडावरची हवा फार थंड. वारा फार. आईसाहेबांची प्रकृति अतिशय नाजूक झालेली. गड त्यांना मानवेना. म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी, गडाच्या निम्म्या डोंगरात असलेल्या, पाचाड नावाच्या गावी एक उत्तम वाडा बांधला.

तेथे त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली. राज्याभिषेकासाठी महाराजांनी आपले हे थोर दैवत अलगद गडावर नेले. लटलटत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कोडकौतुक न्याहाळले. राजा म्हणजे विष्णूचा अवतार. शिवबाला विष्णुरूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिले. आता आणखी काय हवे होते त्यांना? त्यांना काहीही नको होते, पण महाराजांना त्या हव्या होत्या. राज्याभिषेक उरकल्यावर महाराजांनी (बहुधा मेण्यातून ) आईसाहेबांना गडावरून खाली पाचाडच्या वाड्यात आणले. आईसाहेबांनी राजधानीच्या महाद्वाराचा उंबरठा ओलांडला. रायगडाकडे त्यांची पाठ झाली. आईसाहेबांना ते महाद्वाराचे बुरुज जणू काही विचारीत होते, 'आईसाहेब, आता पुन्हा येणे कधी व्हायचे ?'

आता कैचें येणें जाणे ? आता खुंटले बोलणे ! हेचि तुमची अमुची भेटी, येथूनिया जन्मतुटी ! पान पिकले होते, वाराहि भिऊन जपून वागत होता.
आणि पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांनी अंथरूण धरले. महाराजांच्या हृदयात केवढी कालवाकालव झाली असेल? अखेरचेच हे अंथरूण ! आईसाहेब निघाल्या ! महाराजांची आई चालली ! सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरविले. त्यावर दहा वर्षे आईसाहेब थांबल्या. पण आता त्यांना कोण थांबविणार ? … आई ! कसले हें विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे ! जिच्या प्रेमाला किनारे नाहीत. जिच्या प्रेमाचा ठाव लागत नाही. जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे ! पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दय असला पाहिजे !

ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला. बुधवार होता या दिवशी. आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला. वर्षे, महिने, आठवडे, दिवस संपले. आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली. दिवस मावळला. रात्र झाली. मायेच्या माणसांचा गराडा भवती असतांना, सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतांनाही मृत्यूचे पाश पडू लागले. सर्व हतबल झाले होते. कोणाचेही काही चालत नाही इथे.

घोर रात्र दाटली. मध्यरात्र झाली. आईसाहेबांनी डोळे मिटले ! श्वासोच्छ्वास संपला ! चैतन्य निघून गेले ! आईसाहेब गेल्या ! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला ! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दु:खात बुडाले. आईवेड्या शिवबाची आई गेली. शिवनेरीवर अंगाई गाणारी, लाल महालात लाड करणारी, राजगडावर स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली. आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही ! कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकेचे सुख ? ज्यांना आई आहे ना, त्यांनाच, -- नाही, नाही, -- ज्यांना आई नाही ना, त्यांनाच फक्त ते समजू शकेल !
ज्येष्ठ वद्य नवमी, बुधवारी, मध्यरात्री (दि. 1 7 जून 1 6 7 4 ) जिजाबाईसाहेब मृत्यू पावल्या.

Saturday, 24 February 2018

गोंधळ

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा !
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
. .
माळ कवड्यांची घातली गं..
आग डोळ्यात दाटली गं..
कुंकवाचा भरून मळवट
या कपाळीला… आई राजा उधं उधं उधं..
उधं..उधं..
उधं..उधं.. तुळजापूर तुळजाभवानी आईचा
उधं..उधं..
माहुरी गडी रेणुका देवीचा
उधं..उधं..
आई अंबाबाईचा
उधं..उधं..
देवी सप्तशृंगीचा
उधं..उधं..
बा सकलकला अधिपती गणपती धाव
गोंधळाला याव
पंढरपूर वासिनी विठाई धाव
गोंधळाला यावं
गाज भजनाची येऊ दे गं
झांज सुजनाची वाजु दे
पत्थरातून फुटलं टाहो
या प्रपाताचा
चित्रकार - मोहन जाधव

Thursday, 8 February 2018

श्री.भवानी तलवार

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेकडे असलेली श्री.भवानी तलवार

Tuesday, 6 February 2018

सह्याद्री .

भटके आणि सह्यगिरीच्या कडे-कपार्यामध्ये राहणार्या सह्याद्रीपुत्रांचं फार सुंदर नातं आहे,
ह्या नात्याला निश्चित असं काही नाव नाही पण भटके आणि सह्याद्रीपुत्रांमधला "शिव-सह्याद्री" बंध गेली कित्त्येक वर्ष अतूट-अभंग असाच……… !!

ह्या सह्याद्रीपुत्रांचा डोंगरदर्यातला कौलारू संसार म्हणजे तुम्हा-आम्हा भटक्यांची हक्काची वस्ती,
मागची कसलीच ओळख नसता अगदी मन मानेल तेंव्हा यांच्या घरांची पडवी आपल्यासाठी मोकळी असतेच,
सगळं लटांबर आणि कुडी पडवीत निवांत पहुडल्यावर कोण गावचे? नावं काय? वगेरे विचारण्याचे सोपस्कार………!!!

कधी सह्याद्रीच्या वाटांवरचे वाटाडे होऊन, कधी कसलीही ओळख नसता भरपेट जेवायला घालून, कधी संकटात सापडलेले असता रात्री अपरात्री अवघड डोंगरदर्यात मदतीचा बळकट हात देऊन या सह्याद्रीपुत्रांनी आपल्या भटक्यांसोबतचे अनुबंध नेहमी बळकटचं केले आहेत अगदी सहज वृत्तीने……… !!

या सह्याद्रीपुत्रांनी आपल्या भटक्यांना वेळोवेळी केलेल्या मदतीची किमान जमेल तेवढी उतराई करावी या भावनेतून एका कल्पनेचा उदय झाला,

उदय झाला "शिव-सह्याद्री ग्रंथदिंडीचा………"

सह्याद्रीच्या दुर्गम भागात वसलेल्या शाळांची-तिथे शिकणाऱ्या मुलांची अवस्था खरंच बिकट,
शाळेच्या दसकोसातून अवघड डोंगर-दर्या, उफानणारे ओढे-नद्या पार करत पाच-दहा मैल पायपीट करत पोरांना शाळा गाठावी लागते,
ना कळकळ उन्हाची तमा बाळगायची सोय ना मी म्हणणाऱ्या पावसाची,

ये-जा करायला रस्ते नाहीत वाहतूक नाही तेंव्हा टीव्ही-इंटरनेट सारख्या ज्ञानगंगा म्हणजे दिवास्वप्नचं,
तेंव्हा या पोरांना सर्वांगीण जगाची माहिती व्हावी या हेतूने अश्या शाळांमधून किमान २००-३०० सर्वसमावेशक पुस्तकांचं ग्रंथालय सुरु करण्याचं स्वप्न पाहिलं,
योग्य वयात हातात पडलेलं योग्य पुस्तकं एखाद्याच्या आयुष्याची दिशाच बदलू शकतं याचा अनुभव आपल्या सर्वांना आहेच.

थोडे-थोडके पैसे जमा करून सह्याद्रीत किमान एक तरी ग्रंथालय सुरु करावं एवढं छोटं स्वप्न काही जगावेगळ्या अवलीयांच्या मदतीने तगलं,
फक्त तगलं नाही तर प्रचंड विस्तारलं……

अगदी कसलीही पूर्वीची भेट-गाठ नसलेल्यांनी सुद्धा फार मोठी आर्थिक मदत-भरपूर पुस्तकं पाठवली,
कलाकार मित्रांनी कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अतिशय रेखीव "सुलेखन" करून पाठवलं,
छायाचित्रकार मित्रांनी छायाचित्रणाची जबाबदारी न सांगता उचलली,
शिक्षक मित्रांनी शाळकरी मुलांची मानसिकता, विषय-पुस्तकांची निवड ह्याकामी मदत केली,
ह्या सर्वांचे आभार कसे आणि किती मानू हेच समजेनासं झालंय………… !!!

पहिल्या ग्रंथदिंडीला दिवसही अगदीच चांगला सापडला "गुरुपौर्णिमेचा",
आणि शाळा तर त्याहून चांगली, "शिवतीर्थ राजगडाच्या कुशीत वसलेली, वाजेघर गावची"
पहिलं ग्रंथालय शिवतीर्थ राजगडाच्या पायथ्याला होतंय यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं.

आम्ही पुस्तकं द्यायला येतोय म्हणून मुलांनी सजवलेला वर्ग, दाराबाहेर घातलेली रेखीव रांगोळी, शाळेच्या बागेत फुललेल्या फुला-पानांचा बनवलेला पुष्पगुच्छ, लयबद्ध स्वागतगीत, पुस्तकं पाहून हरखलेली पोरं, प्रत्येक पुस्तकाचं पान अन पान निरखून सुखावणारे बालगोपाल पाहून मन केंव्हाच सातव्या आभाळात पोहोंचलेलं………!!!

मित्रहो,
तुम्हा सर्वांच्या मदतीने ग्रंथदिंडीचा श्रीगणेशा तर अतिशय उत्तम झालाय,
येत्या महिन्या-दोन महिन्यात साल्हेरपासून पारगडपर्यंतच्या सह्याद्री पट्ट्यात किमान १० ग्रंथदिड्या पोहोंचवायच्या आहेत तर येत्या वर्ष भरात किमान १००,
या कामी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांच्या मदतीचं खंबीर पाठबळ हवं आहे.

ही सह्याद्रीपुत्र मुलं आर्थिक बाजूने गरीब नक्कीच आहेत पण मानी आहेत-स्वत्व जपणारी आहेत,
आपण त्यांना मदत करतोय ही जरी त्यांची भावना असली तरी आपल्या दृष्टीने ते आपलं कर्तव्यचं आहे………. !!!

तेंव्हा मित्रहो मदतीच्या नाही तर कर्तव्याच्या भावनेतून "शिव-सह्याद्री ग्रंथदिंडी" सह्याद्रीभर पोहोंचवायचा निर्धार करूया………. !!!!!

कलावंतीण दुर्ग किल्ला

जय महाराष्ट्र मित्रांनो, आता आम्ही आपणास महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहिती सांगणार आहोत. महाराष्ट्रात एकूण ३५० च्या वर गडद किल्ले आहेत. हे गडकिल्ले आपल्या कायम स्मरणात असावेत तसेच आपणाला कायम आपल्या इतिहासाची आठवण असावी म्हणून किल्ल्यांची माहिती सांगितली आहे. आता आपण कलावंतीण दुर्ग विषयी जाणून घेणार आहोत.

दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्यारांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे.

 

कलावंतीण दुर्ग

 कलावंतीण दुर्ग

 गडावर पोहचायचे कसे :

हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात. आणि दुसरा उपाय म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबल गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.

‘कलावंतीण दुर्गाचा इतिहास :

कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्ल्यावर महाल बांधून दिला. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.

 

कलावंतीण दुर्ग

कलावंतीण दुर्ग

निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराईमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे. मी आजवर पाहिलेल्या सर्व किल्ल्यांमध्ये चढाई करण्यास अवघड सुळका, असे कलावंतीण दुर्ग बाबत म्हणता येईल. प्रबळगडाच्या शेजारी उभा असलेला कलावंतीण दुर्ग म्हणजे केवळ उंचच उंच एक सुळका आहे. जास्त उंची आणि दगडामधील कोरलेल्या पायऱ्या यामुळे दुर्गाच्या सर्वात वर जाण्यासाठी खूप हिम्मत लागते.

पनवेल आणि कर्जत दरम्यान जून्या मुंबई –

पुणे महामार्गावरून जात असताना प्रबळगड दिसतो. प्रबळगडाच्या परिसरात उल्हास नदी, पाताळगंगा नदी, माणिकगड, कर्नाळा, इर्शाळगड आणि जवळच माथेरानचा डोंगर आहे. मुंबई पुणे महामार्गावरून कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडकडे पाहिल्यास प्रबळगड म्हणजे महादेवाची पिंड आणि कलावंतीण दुर्ग म्हणजे समोर बसलेला नंदी असे दृश्य दिसते. माथेरानच्या सनसेट पाँईंटवरून दिसणारा सूर्यास्त प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गच्या मध्ये होतो.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेल्या माची प्रबळ या गावी पोहचण्यासाठी ठाकूरवाडी या गावातून जावे लागते.

शेडुंग मार्गे :

मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जून्या पनवेल – पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. शेडुंग गावापासून ठाकूरवाडी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा असतात. तेथून पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते.

माथेरान – प्रबळगड मार्गे :

माथेरानजवळ असलेल्या पिसरनाथ मंदिराजवळून आकसरवाडी गावामधून प्रबळगडचा डोंगर चढता येतो. प्रबळगडावर गिर्यारोहणासाठी माथेरान मार्गे येणारे पर्यटक याच वाटेने येतात. शेंदुंग मार्गे आल्यानंतर माची प्रबळ गावामध्ये प्रबळ गडाच्या पायथ्याशी हॉटेल आहेत. तेथे जेवणाची सोय होऊ शकते. परंतु प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग पाहण्यासाठी मुक्कामी जाणाऱ्या गिरी प्रेमींना माची प्रबळ गावाच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या पठारावरच तंबू ठोकून रहावे लागते. माची प्रबळ गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेच्या परिसरात देखील गिरीप्रेमी तंबू ठोकून राहतात.

कलावंतीण दुर्ग

प्रबळगडचा इतिहास :

प्रबळगड केंव्हा बांधला याची इतिहासात नोंद नाही. परंतु प्रबळगडावर असलेल्या गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड ठरवता येऊ शकतो. बुद्ध कालीन अथवा त्यानंतरच्या कालखंडात या गडाचे बांधकाम झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रबळगडाची मोक्याची जागा पाहता परिसरातील पनवेल आणि कल्याणच्या समुद्रातील प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला असावा, असे म्हणतात. प्रबळगड हा व्यापारी मार्गावर तसेच समुद्र किनार्यापासून जवळच असलेला गड आहे. त्यामुळे शिलाहार आणि यादवांनी येथे लष्करी तळ उभारला होता. यादवांनी त्यावेळी गडास मुरंजन असे नाव दिले होते.

काही काळानंतर मुरंजन अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. त्यावेळी निजामशाहीत असलेल्या शहाजी महाराजांनी मुघलशाही, निजामशाही आणि आदिलशाही असा संघर्ष सुरु असताना मुरंजनावर आश्रय घेतला होता. मुरंजनवर त्यावेळी शहाजी राज्यांच्या सोबत त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई साहेब आणि बाळ शिवाजी देखील होते. त्यानंतर इ.स. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला, या तहानुसार मुरंजनवर मोघलांची सत्ता स्थापन झाली.

काही काळानंतर इ. स. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठेशाहीचा सरदार आबाजी महादेव यास कल्याणच्या मोहिमेवर पाठवले. त्यावेळी कल्याण, भिवंडीपासून रायरीपर्यंतचा सारा मुलूख आबाजी महादेव यांनी स्वराज्यात घेतला. तेंव्हाच हा मुरंजन स्वराज्यात आला. त्यावेळी किल्ल्याचे नाव बदलून किल्ले “प्रबळगड” असे ठेवण्यात आले. ( प्रबळ गडास प्रधानगड असे देखील म्हणतात.) . इ. स. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मिर्झा राजे जयसिंग यांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड कलावंतीण दुर्ग देखील होता. त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग यांनी किल्ल्यावर राजपूत सरदार केशरसिंह यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. त्यानंतर झालेल्या केशरसिंह राजपूत आणि मराठ्यांच्या लढाईमध्ये प्रबळगड पुन्हा स्वराज्यात आला. पुढे कंपनी सरकारने प्रबळगडला माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे ते शक्य होवू शकले नाही.

कलावंतीण दुर्गाचा इतिहास : (साभार इंटरनेट)

असे म्हणतात कि, पूर्वी कोण्या एका राजाचे कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून जावू नये, म्हणून त्या राजाने कलावंती राणीला प्रबळगडाच्या शेजारी असलेल्या सुळक्यावर एक महाल बांधून दिला. आजच्या दिवशी कलावंतीण दुर्गच्या सुळक्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु सुळक्यावर चढण्याकरिता दगड कापून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि याची उंची खूप आहे.

प्रबळगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गवर पाहण्यासारखे तसे काहीच नाही. प्रबळगडावर जात असताना वाटेवर पडलेल्या अवस्थेतील एक बुरुज आहे. प्रबळगडावर गेल्यानंतर आपल्याला दिसते कि समोर पठार आहे. गडावर वास्तूंचे अवशेष आहेत तसेच भरपूर झाडी देखील आहे. प्रबळगडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच भग्न अवस्थेतील नंदी आहे.

प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गवर गिर्यारोहण करण्यासाठी गिरीप्रेमी येत असतात. कलावंतीण दुर्गचा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी येत असतात. कलावंतीण दुर्गच्या सर्वात वरच्या टोकावर गेल्यानंतर परिसरातील माथेरान, चांदेरी, पेब दुर्ग, इर्शलगड, कर्नाळा किल्ला आणि समोर पनवेल तसेच नवी मुंबई शहर सहजपणे दिसते.

माची प्रबळ गावाच्या संरक्षकासारखा त्यांच्या मागे उभा असलेला हा मुरंजन डोंगर माची प्रबळ गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच कलावंतीण दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. परिसरातील लोक प्रबळगडावरील मंदिरामध्ये पूजा करतात.

गिर्यारोहणाचा थरार अनुभवण्यास उत्सुक असलेल्या गिरीप्रेमींसाठी प्रबळगड (मुरंजन / प्रधानगड) आणि कलावंतीण दुर्गचे गिर्यारोहण एक पर्वणी आहे.