! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 23 November 2014

" शालीनी महाल "


कोल्हापूर संस्थानच्या राजकन्या श्रीमंत शालीनी राजे यांच्या प्रीत्यर्थ, इ. सन. १९३१-३४ दरम्यान आठ लक्ष रूपये खर्च करून शालीनी महाल बांधला. २.५ मैल व्यासाच्या रंकाळा तलावाच्या पार्श्वभूमीवर, तळयाच्या पश्चिम काठावर सुंदर बागा, उंचच उंच ताडाची झाडे व हिरवाईने हा महाल सुशोभित झाला आहे. महालाच्या बांधकामात काळया दगडामधे कोरलेले नाजूक नक्षीकाम आहे. इटालियन संगमरवराचा नक्षीकामामरिता केलेला उपयोग वाखाणण्यासारखा आहे. महालाचे दरवाजे लाकडाचें असून, त्यात भारी बेल्जियमची काच वापरून, त्या काचेच्या दरवाज्यावर कोल्हापूरच्या महाराजांची प्रतिमा आहे. या सा-यामुळे महालाचे राज-वैभव डोळयात भरते. महालातील भव्य कमानी व सज्जा हया चकाकणा-या काळया उंची प्रतीच्या दगडात बनविल्या आहेत. त्यामुळे महालाची एकंदर ऐट व भव्यता पाहाणा-याचे भान हरपून घेते. काचेचे नक्षीकाम व मनो-यावरचे घडयाळ आपले पारंपरिक वैभव दिमाखाने मिरवत आहेत. पौर्णिमेच्या रात्री महालाचे प्रतिबिंब रंकाळयाच्या संथ व शांत पाण्यात, संध्यामठाच्या बाजूने पाहणे हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.

! "" बीजे एक वादळ "" !


" माथेरान "

माथेरान

मुंबई आणि पुणे इथून सर्वात जवळचे आणि तरीही निसर्गसौंदर्याने नटलेले असे हे ठिकाण आहे. २,६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलेले आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा वेगळी पडलेली माथेरानची ही डोंगररांग हाजीमलंगपासून सुरू होते. १८५० मध्ये ह्युज मॅलेट या ठाण्याच्या कलेक्टरने हे ठिकाण शोधून काढले.
मुंबईहून कर्जतला जाताना नेरळ स्टेशनला उतरून माथेरान गाठता येते. नेरळ हे गाव माथेरानच्या पायथ्याशी वसलेले आहे. माथेरानला जाणारी ट्रेन नेरळहून सुटते आणि २१ कि.मी.चे अंतर दोन तासात पार करते. या गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे, हे माथेरान भेटीतील एक प्रमुख आकर्षण असते. ही ट्रेन पेब आणि माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून पॅनोरमा पॉईंटला वळसा घालून माथेरानमध्ये प्रवेश करते. इथे कुठल्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही त्यामुळे इथल्या निसर्गसौंदर्याला अजूनतरी प्रदुषणाचे गालबोट लागलेले नाही. जिथून पुढे वाहनांना प्रवेश नाही त्या दस्तुरी नाक्यावरून २०-२५ मिनीटे चालल्यानंतर मध्यभागी असलेल्या मार्केटमध्ये येतो. बहुतेक हॉटेल्सही याच भागात आहेत.
माथेरानमधील विविध पॉईंटस् - 
शार्लोट लेक - मार्केटपासून १ कि.मी. अंतरावर हे तळे आहे. येथील पाण्याचा मुख्य स्रोत हे तळेच आहे
पॅनोरमा पॉईंट -
उत्तर टोकावरील या पॉईंटच्या पूर्व व पश्चिम बाजूला दरी आहे. इथून पूर्वेच्या बाजूला नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलूख दिसू शकतो. हा मार्केटपासून लांब म्हणजे साडेपाच कि.मी. अंतरावर आहे.
सन सेट पॉईंट -
ह्या पॉईंटच्या समोरच प्रबळगड दिसतो. मार्केटपासून अंतर साधारण साडेतीन कि.मी. आहे. सन सेट पॉईंटखालून वाघाच्या वाडीतून ट्रेकिंग करत वर येता येते.
चौक पॉईंट -
हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे. येथून खाली चौक गाव दिसते, म्हणून या नावाने तो ओळखला जातो. इथे जवळच वन ट्री हिल पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या समोरच मति गुंग करणारी भीषण दरी आहे. इथून जाणारी पायवाट एका सुळक्याला जाऊन मिळते. त्या सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते, तो सुळका म्हणजे वन ट्री हिल पाईंट.
गार्बट पॉईंट -
येथील सर्वात दुर्लक्षिलेला असा हा पॉईंट आहे. एका बाजूला दरी व दुस-या बाजूला जंगल अशा रस्त्यावरून चालत आपण या पॉईंटला येतो. इथे येण्यात खरी मजा पावसाळयात आहे. धुक्यांनी वेढलेल्या जंगलातून पावसाळयात भटकण्याची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी पावसाळाही इथे भेट देण्यासाठीचा उत्तम मोसम आहे. पावसाच्या मा-यामुळे कुठल्याही पॉईंटला जाणे शक्य होत नाही. पण धुक्याचे लोट अंगावर घेण्याची ज्यांना आवड आहे, त्यांनी पावसाळयातही जरूर यावे. इथल्या लोकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे. मार्केटमध्ये ब-याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स आहे. सांबराच्या कातडयाच्या वहाणा व बूट, तसेच वेताची काठी, छोटया छोटया चपलांचे सेट अशा ब-याच वस्तू इथे स्थानिक विक्रेते विकताना दिसतात. इथे माकडांचे प्रमाण जास्त आहे. आपण खात असताना हातातील खाद्यपदार्थांचा पुडा पळवून नेऊ शकतात, इतकी ती माणसाळलेली आहेत.
माथेरानमध्ये राहण्याच्या ब-याच सोयी आहेत. दस्तुरी पॉईंटला लागूनच एम.टी.डी.सी.ची रेस्ट हाऊसेस आहेत. इतरही बरीच लहान-मोठी हॉटेल्स आहेत. नेरळ-माथेरान गाडीच्याही मोजक्याच चकरा असल्याने त्या वेळेवर पाळाव्या लागतात. जे स्वतःची गाडी घेऊन येतात, त्यांना गाडया दस्तुरी पॉईंटजवळ लावाव्या लागतात. याशिवाय नेरळ-माथेरान टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे.

! "" बीजे एक वादळ "" !

' आंबोली "


ब्रिटीश अधिकारी कर्नल वेस्ट्रूप याने आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसीत केले आहे. सावंतवाडीहून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण दोन दिवस निसर्गसान्निध्यात घालवण्याच्या दृष्टीने हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान इथे जवळजवळ ७५० सेमी. एवढा पाऊस पडतो. यादरम्यान हा पूर्ण परिसर धुक्याने वेढलेला असतो.
सावंतवाडी ते आंबोली घाटात सावंतवाडी संस्थानिकाचा राजवाडा दिसतो. इथे देवीच्या मंदिराजवळ हिरण्यकेशीचे मंदिर व साधूचा आश्रम आहे. हिरण्यकेशी मंदिरामध्ये हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. आंबोलीची उंची ६६४ मीटर्स आहे. या परिसरामध्ये सदाहरित, समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णी अरण्य आणि घनदाट जंगले पसरलेली आहेत. आंबोलीपासून १० किलोमीटरवर नांगरतास हा ७० फूट उंचीचा धबधबा आहे. इथे एम.टी.डी.सी.चे रेस्टहाऊस आहे. त्याच्या मागच्या उद्यानात सांबर, चितळ, भेकर, साळिंदर असे प्राणी ठेवलेले आहेत. याच्या पश्चिमेला महादेवगड, तर उत्तरेला मनोहरगड व मनसंतोषगड हे किल्ले आहेत.
इथले आरक्षण मुंबईच्या एम.टी.डी.सी.च्या ऑफिसमध्ये होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर व बेळगाव इथून आंबोलीपर्यंत एस.टी.ची सोय उपलब्ध आहे. 

! "" बीजे एक वादळ "" !


" महाबळेश्वर "

महाबळेश्वर

मुंबई-गोवा महामार्गावर जाताना महाड सोडल्यावर डावीकडच्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये रायेश्वर, महाबळेश्वर, कोल्हेश्वर अशी एकापेक्षा एक उत्तुंग पठारे लागतात. यापैकी महाबळेश्वर हे ब्रिटीश कालातच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्दीस आले होते. ब्रिटीशांनी या ठिकाणाला मुंबई प्रांताची उन्हाळयातील राजधानी म्हणून विकसीत केले होते. या ठिकाणी येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग (पोलदपूर मार्गे) हा सोयीचा मार्ग आहे. या शिवाय मुंबई-पुणे किंवा मुंबई-बँगलोर महामार्गावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर वाई-पाचगणी मार्गे महाबळेश्वर गाठता येते.
चेरापुंजी नंतर भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे हे दुस-या क्रमांकाचे ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळयात महाबळेश्वर बहुतांशी चार महिने बंदच असते. महाबळेश्वर ते प्रतापगड मधले घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचे खोरे. अफझलखानाचा प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वध केल्यानंतर मराठयांनी आदिलशाही फौजेला याच जावळीच्या खो-यात धूळ चारली होती.
महाबळेश्वरची उंची ४,७१८ फूट आहे, त्यामुळे इथून सह्याद्रीतील द-या, कडे-कपारींचे होणारे दर्शन हे निश्चितच वेगळे आहे.ब्रिटीशांच्या नावांनी ओळखले जाणारे इथले विविध पॉईंटस् पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. यापैकी काही पॉईंटस् बाजारपेठेच्या जवळ तर काही १०-१३ किलोमीटरच्या परिघात आहेत. यामध्ये सर्वात प्रसिध्द आर्थर सीट पॉईंट आहे, जिथून महाबळेश्वरच्या सगळया द-याखो-यांचे दर्शन होते. याच पॉईंटपासून खाली असलेल्या विंडो पॉईंटपासून ढवळया घाटाने ट्रेकर्सना कोकणात उतरता येते. महाबळेश्वरपासून पुण्याला जाण्याच्या रस्त्यावर केटस् पॉईंट आहे. इथून कृष्णा नदीवर बांधलेल्या धोम धरणाचा परिसर, डावीकडे घंटेच्या आकाराचा कमळगड आणि समोर दिसणारे पाचगणीचे टेबलटॉप यांचे दर्शन होते. महाबळेश्वरचे पश्चिम म्हणजे लॉडविग पॉईंट. ज्याने १८२४ मध्ये मुंबईच्या उष्ण वातावरणापासून काही दिवस दूर जाता यावे म्हणून महाबळेश्वरचा आणि या पॉईंटचा शोध लावला, त्या जनरल लॉडविगच्या नावावरून या पॉईंटला लॉडविग पॉईंट असे नाव देण्यात आले. इथून पश्चिमेचा प्रतापगड आणि त्या खालचे जावळीच्या खो-याचे निसर्गदृश्य दिसते.
येथील सर्वात जुने ठिकाण म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर. या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी ही महाराष्ट्रात इतर कुठेही न आढळणारी फळे आपल्याला महाबळेश्वरला मिळतात. इथला मधही चांगला असतो.
पाच पर्वतांनी वेढलेले पाचगणीही इथून जवळच आहे. येथील प्रसिध्द टेबलटॉप पठार, ब्रिटीश आणि पारशी पध्दतीची घरे, हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर यामुळे हे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीस उतरते. तसेच महाबळेश्वरहून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेले तापोळे हे नव्याने उदयास आलेले, शिवसागर तलावाच्या काठावर असलेले ठिकाण आहे.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सुपरिचीत आहे. माणसांचीही इथे सतत वर्दळ असते त्यामुळे राहण्याची-जेवण्याची सोय असलेली भरपूर हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. याशिवाय एम.टी.डी.सी. चे बंगलेही आहेत. खिशाला परवडण्याजोग्या दरात आपली इथे सोय होऊ शकते.

! "" बीजे एक वादळ "" !


" महाराष्ट्र नकाशा "

 





! "" बीजे एक वादळ "" !

" सिंधुदूर्गाची सफर - देवगड किनारा "



समुद्रच्या काठावर वसलेला देवगड किल्ला.
हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिध्द झालेले देवगड अत्यंत देखणे आहे. समुद्रच्या काठाला देवगड किल्लयाचे अवशेष अजूनही मनमोहक आहेत. समुद्रकिना-याला उंच टेकडीवर पवनचक्क्या उभारल्या आहेत. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूला समुद्र असा देवगडचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे. देवगड बंदरामध्ये मासेमारीच्या असंख्य बोटी नांगरलेल्या असतात. पूर्वी देवगड हे किनारपट्टीवरचे गजबजलेले बंदर होते. हे नैसर्गिक बंदर असल्याने अनेक मोठमोठया बोटी थेट किना-यापर्यंत येऊन लागत. देवगड किल्ला आनंदवाडी बंदराच्या मागील डोंगरावर वसला आहे. तटबंदी अजूनही ब-यापैकी शाबूत असून आत दीपगृह आहे. किल्ल्यामध्ये वाहन जाऊ शकेल अशी सोय आहे. सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात हा भाग आहे.
दोन टेकडयांमधील देवगडच्या किना-या पलीकडच्या डोंगरावर समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे विसावलेले असतात.
देवगड किना-यावरील पवनचक्क्या. सध्या बहुतेक सगळया बंद अवस्थेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने या पवनचक्क्या उभारल्या आहेत.
 
देवगड परिसरात सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. अत्यंत कष्टाने त्या उभ्या केल्या आहेत. मातीचा मागमूसही नसलेल्या ठिकाणी कातळामध्ये खड्डे काढून त्यात बाहेरून माती आणून रोपे लावली असून प्रसंगी माणसाकडून खांद्यावरून मिळेल तेथून पाणी आणून ही झाडे जतन केली आहेत. इथल्या शेतक-याने विज्ञानाची कास धरून आंब्यावर वेगवेगळे प्रयोग केले असून त्यामुळे उत्पन्न आणि दर्जा वाढवण्यास मदत झाली आहे.
देवगडच्या जवळच वाडा येथे विमलेश्वराचे देऊळ प्रसिध्द आहे. मागे उंच डोंगर. समोर वाहता ओढा, आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी. डोंगराच्या पायथ्याशी संपूर्ण दगडात कोरीव काम केले असून ते पांडवकालीन असल्याची लोकांची समजूत आहे. देवळातील पिंडी वैशिष्टयपूर्ण आहे.
मुंबई-देवगड अंतर ४८० किलोमीटर. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावहूनही देवगडला जाता येते. अंतर ५०-५५ किलोमीटर.
वाडानर खाडी देवगडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.
विजयदुर्ग किल्ला. जेटीवरून
विजयदुर्ग देवगडपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावरचे देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडचे शेवटचे टोक. मुंबई-गोवा महामार्गावर नरळे येथे उतरून थेट विजयदुर्गला जाता येते. हे अंतर ५५ किलोमीटर आहे. विजयदुर्गच्या रस्त्यावर आजूबाजूला सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. खाडीच्या पलिकडे रत्नागिरी जिल्हा सुरू होतो.
सन ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने हा किल्ला बांधला. सन १२१८ मध्ये देवगिरीच्या यादवांनी तो ताब्यात घेतला. सन १३५४ मध्ये विजयनगरच्या राजानी यादवांचा पराभव करून कोकण प्रांत बळकावला. त्यानंतर १२५ वर्षे हा किल्ला विजापूरकरांच्याकडे होता. सन १६५३ मध्ये शिवराजानी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या.
किल्ल्यामधील पक्की बांधलेली विहिर.
हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटर असून बाजूने ४० किलोमीटर लांबीची विजयदुर्ग खाडी आहे. हे एक उत्कृष्ट बंदर आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर आहे. ५ तटबंधामुळे किल्ला मजबूत व अभेद्य झाला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात मारूतीचे मंदिर असून आत शंकराच्या व भवानी मातेच्या मंदिराचे अवशेष सापडतात. किल्ल्याला एकूण २० बुरूज असून आत हत्ती, घोडयांच्या पागा आहेत. पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबतखाना, साहेबाचे ओटे, दोन भुयारी मार्ग इत्यादि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठयांचा अंमल होता. सुमारे ७०० वर्षांहून अधिक स्वबळावर प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभे असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले. इंग्रज, पोर्तुगिज, डच या परकियांनी गिब्राल्टर म्हणून उल्लेख केलेला हा किल्ला मराठेशाहीच्या अपूर्व शौर्याचा वारसा आहे.
दक्षिणेकडील रेड्डी गावापासून सुरू झालेली सिंधुदुर्गच्या समुद्रकिना-याची सफर विजयदुर्ग किल्ल्यावर येऊन संपते. अत्यंत रमणीय पण दुर्लक्षित असा हा भाग सहलीसाठी अत्यंत सुरक्षित, कमी खर्चाचा आणि साहसाचा अनुभव देणारा असा आहे. इथला माणूस थोडासा चौकस आहे. पण शहरात दुर्मिळ झालेली माणूसकी तुम्हाला इथे नक्कीच अनुभवायला मिळेल. योग्य नियोजन केले तर कोणतीही अडचण न येता सहलीचा आनंद उपभोगता येईल.
विजयदुर्ग किल्ल्याचा बुरूज.
टिप - महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी तंबू निवास, पर्यटन निवास उभारलेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोठेही राहण्या-जेवण्याची अडचण भासणार नाही.

! "" बीजे एक वादळ "" !


" सिंधुदूर्गाची सफर - आचरा किनारा "

मालवणहून आच-याला निघाल्यानंतर आडारी नदीचा पूल ओलांडल्यावर सर्जेकोट लागतो. मालवणपासून हे ठिकाण ८-९ किलोमीटर अंतरावर आहे. मासेमारीच्या असंख्य बोटी इथे नांगरलेल्या दिसतात. समुद्राच्या काठाला नारळी पोफळीच्या बागा आणि त्यामध्ये विखुरलेली घरे हे नेहमीचे कोकणचे दृष्य इथेही पाहायला मिळते.
कालावल खाडीच्या किनारी झाडीत वसलेले गाव.
गड नदीवर कालावल येथे मोठा खाडी पूल आहे. दोन्ही बाजूला पाण्याच्या काठाने नारळी पोफळीची झाडे, त्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब आणि अधून मधून दिसणारी घरे... पुलावर हे पाहायला तुम्ही थांबला की पुढच्या प्रवासाला जाण्याची इच्छाच होत नाही. कालावल नंतर नारळी पोफळीची झाडे कमी कमी होत जातात, आणि आंब्याच्या बागा सुरू होतात. लाल कातळामध्ये खड्डे काढून हापूस आंब्याची झाडे लावून त्यांना कावडीने लांबून पाणी आणून हा आंबा कोकणी माणसाने परदेशी पाठवला आहे. हे प्रचंड श्रम मागे असल्यानेच हापूस आंबा इतका गोड लागतो.

आचरा बंदर किनारा.
आचरा बंदर या नावातच फक्त आता बंदर उरले आहे. एके काळी हेही एक चांगल्यापैकी बंदर होते. सध्या मात्र त्याचे अस्तित्वच हरवले आहे. आच-याचे ग्रामदैवत रामेश्वर हे एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. दर तीन किंवा पाच वर्षांनी या देवाची यात्रा होते. त्यावेळी सतत तीन रात्री सर्व सजीव प्राणी आणि ग्रामवासीय गावाच्या सीमेबाहेर राहतात. मालवणपासून आचरा साधारण १५-१६ किलोमीटर अंतरावर आहे. येथून मालवण कणकवली आणि देवगडलाही जाता येते. समुद्राच्या काठाला खाजगी रित्या राहण्याची व जेवणाची सोय होते. ट्रेकिंग करणारे अनेक लोक इथे राहतात आणि समुद्र काठाने चालत जाऊन येतात.
सिंधुदूर्गाची सफर - कुणकेश्वर किनारा
कुणकेश्वर मंदिर. देवगडच्या दक्षिणेस 20 किलोमीटर अंतरावर समुद्राच्या काठावर हे शंकराचे मंदिर बांधलेले आहे. याचा कालावधी इसवी सन 11 वे शतक समजला जातो. महाशिवरात्रीला येथे प्रचंड यात्रा भरते.
कुणकेश्वरचा समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ असून सुरक्षितही आहे. मोठया प्रमाणावर मासेमारी चालते. संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी न चुकता थांबावे. धार्मिक आणि सहलीचे ठिकाण अशा दोन्ही महत्त्वामुळे कुणकेश्वर चांगलेच प्रगत झाले आहे. इथे घरोघरी राहण्याची आणि जेवणाची सोय करतात. तुमच्याजवळ जर गाडी असेल तर ती पुढे देवगडला पाठवावी आणि किना-याने चालत देवगडला जावे. साधारण दीड ते दोन तासात रमत गमत देवगडला पोहोचता. चालण्याचे श्रमही जाणवणार नाहीत असा हा प्रवास आहे. देवगड कुणकेश्वर रस्त्याने १७-१८ किलोमीटर आहे. ३-४ किलोमीटरवर मिठबाव हे आणखी एक रमणीय ठिकाण आहे.
कुणकेश्वर ते मिठबाव साधारण १२ किलोमीटर अंतर आहे. सध्याचा नवीन पूल बांधल्याने हे अंतर निम्म्याहून कमी झालेले आहे. मिठबावला पांढ-याशुभ्र रेतीचा समुद्रकिनारा असून तो अत्यंत सुरक्षित आहे. मिठबावचा समुद्रकिनारा ६ किलोमीटर इतका लांब पसरलेला आहे. मिठबाव कुणकेश्वर या लांब पसरलेल्या समुद्रकिना-याने चालत जावे. किना-यावर जमलेल्या कोळयांची मासेमारी पाहावी. त्यांच्याकडून ताजे मासे विकत घेऊन कुणकेश्वरला त्या ताज्या माश्यावर ताव मारावा. बस्स! संध्याकाळी रम्य सूर्यास्त पाहावा. पाण्यात मनसोक्त डुंबावे. किना-यावर लहान मुलांच्या बरोबर खूप खेळावे. यापरता दुसरा आनंद कोणता? आंब्याच्या मोसमात रस्त्याच्या दुतर्फा फळांनी लगडलेली आंब्याची झाडे मन मोहून घेतात. आंबे उतरण्याचे काम सुरू असते. मोठमोठया राशी पॅकिंग करून लांब लांब आंबे पाठवण्याचे काम चालू असते. पण तुम्हाला शेतक-याकडून आंबा मिळणार नाही. बिचा-याला स्वत:लाच तो मिळत नाही. कारण बाग अगोदरच विकलेली असते. मात्र जामसांडे, देवगड येथे व्यापा-यांचेकडे आंबा विकत मिळतो.


सूर्यास्त. कुणकेश्वर किना-यावरून.

" श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग "


सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे. उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे.
या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात.

त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव :
१) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो.
२) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस.
३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.
४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा.
५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.
त्र्यंबकेश्वरला कसे जाल?
हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.
रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.
बसमार्ग  - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मी
नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.
त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात.

! "" बीजे एक वादळ "" !

" काळाराम मंदीर "

काळाराम मंदीर

नाशिकमधील पंचवटीतील हे एक मुख्य मंदीर. या मंदिराला चारही दिशांनी दरवाजे आहेत. सभोवती १७ फूट उंचीचा दगडी कोट आहे. मंदिरात पाय-या चढून गेल्यावर राम, लक्ष्मण, सीता यांच्या काळया पाषाणाच्या सुमारे २-२ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या सभोवती सर्व बाजूंनी ओव-या आहेत. मधील पटांगण २४५ फूट लांब व १०५ फूट रूंद आहे. मंदिरापुढे मोठा सभामंडप आहे. त्यात १२ फूट उंचीचे ४० खांब आहेत. त्यात पश्चिमाभिमुखी मारूतीची काळया पाषाणाची मूर्ती आहे. इ. स. १७७८ साली सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदीर बांधण्यास सुरुवात केली असे कागदपत्रावरून कळते. काळयारामाचे हे वैभवशाली मंदीर ओढेकर जहागिरदारांनी बांधले आहे. १७८२ साली त्याच्यावर कळस चढला. येथे चैत्र शु. १ पासून चैत्र शु. ९ रामनवमीपर्यंत उत्सव साजरा होतो. चैत्र शु. ११ ला एका रथातून रामाची स्वारी व दुस-या रथातून मारूतीची स्वारी निघते. हा रथाचा सोहळा पहाण्यासारखा असतो.
रथ यात्रा - लक्ष्मण आणि सीता समवेत श्रीराम असलेले - 'काळाराम मंदीर' पंचवटीच्या परिसरामधे, चैत्र प्रतिपदेपासून तो चैत्र पौर्णिमेपर्यंत असा १५ दिवस श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करतात. दुपारी ठीक १२ वाजता जन्मोत्सव सुरू होतो. हजारो यात्रेकरू या मंगलसमयी हजर राहतात. पंचवटी येथील श्री. काळाराम मंदीर संस्थानामार्फत हा जन्मोत्सव साजरा होतो. नवमीनंतरच्या दुस-या दिवशी देवळाच्या पूर्व दरवाजामधून निघणारी भव्य रथयात्रा हे जन्मोत्सवातील आकर्षण. सा-या नाशिक गावामधून ही यात्रा भ्रमण करते. साधारणपणे दुपारी ४ वाजून ३० मिनीटांनी निघणा-या या मिरवणुकीमधे 'श्रीराम रथ', तसेच 'गरूड रथ' देखील असतात. श्रीमंत पेशवे यांनी इसवी सन १७८५ मधे, श्रीराम रथ करविला. हा रथ बराच वजनदार असून त्या काळी तो श्रीमंतांनी सरदार रास्ते यांच्याकडे सोपविला. यात्रेच्या आधीची रोषणाई, तसेच रथाची डागडुजी यांच्या पोटी दरवर्षी दोनशे रूपयांचा निर्वाह खर्च त्या काळी दिला जात असे. काळाच्या ओघात हा निर्वाह खर्च देखील आज कितीतरी पटींनी वाढला आहे. 'राम रथा'ची व्यवस्था ही पंचवटी येथील रास्ते आखाडयावर सोपविली आहे. या आखाडयातील स्वयंसेवक या रथाची संपूर्ण जबाबदारी घेतात. दुसरा रथ म्हणजे, 'गरूड रथ', हा श्री काळाराम मंदीर संस्थानच्या मालकीचा आहे. उंची व वजनाने देखील हा रथ रामरथापेक्षा जरा लहानखुरा आहे. यात्रेच्या दिवशी श्री. अहिल्या राम व्यायामशाळेमार्फत, 'गरूड रथा'ची सर्व काळजी घेतली जाते. अहिल्या राम व्यायाम शाळेतील विद्यार्थी व स्वयंसेवक आपणहून या दिवशी पुढे येतात व यात्रेमधे नेटाने झटतात. कै. श्री. दिगंबर दिक्षित यांच्याकडे 'गरूड रथा'चे नेतृत्व इ. सन १९४० पर्यंत होते. फक्त एकदाच एका यात्रेकरूला प्राण संकटातून वाचवण्याचा प्रकार वगळल्यास, एरवी कुठलाही अनुचित प्रकार न घडता, श्री. दिगंबर दिक्षितांच्या समर्थ नेतृत्त्वाखाली, शिस्तबध्द रितीने रथ यात्रेचे आयोजन होत असे. या दुर्घटनेत रथाचे चाक त्यांच्या मांडीमधे घुसले, आणि ५ दिवसांनंतर त्यांचा अंत झाला. त्यानंतर रथाचे नेतृत्त्व इ. सन. १९४१ मधे, त्यांच्या मोठया मुलाकडे, श्री. बाबूरावजी दिक्षितांकडे गेले. श्री. बाबूरावजी दिक्षित यांच्या समर्थ नेतृत्त्वामुळे, रथ यात्रेमधे नेटकेपणा आला, शिस्त आली. त्यांच्या निधनानंतर इ. सन. १९९९ मधे श्री. गोविंदराव दिक्षित यांनी रथाचे नेतृत्व आपल्याकडे घेतले. एकूण ५ कडयांनी मिळून ही रथयात्रा सजते. सनई, चौघडा वाहून नेणारी बैलगाडी, दुस-या कडयामधे प्रभु रामचंद्रांची पालखी, मग त्यामागून येणारे पूजाधिकारी, मग गरूड रथ आणि सरते शेवटी श्रीराम रथ या यात्रेमधे असतो. रथाभिमुख उभे राहून, दोन्ही हातांनी वंदन करून, संपूर्ण दिवसभर पूजाधिकारी हा, या रथ यात्रेबरोबर चालत जातो. चैत्र प्रतिपदेपासून रथयात्रेच्या दिवसापर्यंत तो उपवास करतो. निरनिराळया संस्थांमधून आलेले रथ सेवक हे, एका मजबूत दोरखंडाच्या साहाय्याने दोन्हीही रथ ओढतात. या रथांना 'धुरी' म्हणजे, एक मोठा गोलाकार लाकडी दंड जोडलेला असतो. ज्या यात्रेकरूंची देवळातला जन्मोत्सव पाहण्याची संधी हुकली आहे, त्यांना सारा दिमाखदार सोहळा पाहता यावा, हा या रथ यात्रेमागील हेतू आहे. या रथ यात्रेस दरवर्षी हजारोंनी भाविकांची गर्दी उसळते. श्रीरामांच्या प्रतिमेस गंगा स्नान घालतात. 'अवभृत स्नाना'करिता गोदावरीच्या काठावर ही रथ यात्रा २ तासांकरिता थांबते. पावन राम-घाटापाशी हा स्नान-समारंभ पार पडत असताना फटाक्यांची आतषबाजी, आणि रंगीबेरंगी भुईनळया यांनी सारे वातावरण दुमदुमून जाते. या यात्रेची सांगता, जिथून सुरू झाली तिथेच म्हणजे, 'काळाराम मंदिरा'पाशी खूप उशीरा म्हणजे रात्री २ वाजता होते.

" सिंधुदूर्गाची सफर - मालवणचा किनारा "

धामापूर- तलावाच्या काठाला बांधलेले भगवती देवीचे मंदिर.

धामापूर- तलाव
गोडया पाण्याचा प्रचंड जलाशय. या तलावाच्या किनाऱ्याला शासनाची रोपवाटिका असून हिवाळयात जलाशयाच्या दलदलीच्या भागात अनेक पक्षी स्थलांतर करून येतात. हे पाणी धामापूर काळसे गावास वापरण्यासाठी पुरविले जाते. कुडाळ-मालवण रस्त्यावर कुडाळपासून १३-१४ किलोमीटरवर नेरूरपार खाडीच्या पुढे हा तलाव आहे.

सिंधुदुर्ग किल्ला - होडीतून. शिवराजांच्या दूरदृष्टीचे प्रतिक


किल्ल्यावरील शिवाजी राजांचे मंदिर
मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला हे या जिल्ह्याचे वैभव. मालवणपासून एक ते दीड किलोमीटरवर समुदात हा किल्ला वसलेला असून बोटीने किल्ल्यावर जाण्याची सोय आहे. शिवाजी राजांचे एकमेव मंदिर या किल्ल्यात असून महाराष्ट्रात इतर कोठेही शिवाजी राजांची मूर्ती देवळात बसवण्यात आलेली नाही. या मंदिराचा मंडप छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे. किल्ल्याच्या चारी बाजूंनी अद्यापही बऱ्यापैकी तटबंदी शिल्लक आहे. किल्ल्यावर गोडया पाण्याच्या विहिरी आहेत. १६६४ मध्ये शिवाजी राजांनी 'कुरटे' बेटावर हा किल्ला उभारला. ४४ एकर क्षेत्रावर हा किल्ला बांधायला ३ वर्षे लागली.

नेरूरपार खाडी, पुलावरून खाडीचे चित्र
कुडाळ-मालवण रस्त्यावर ८-९ किलोमीटरवर कर्ली नदीच्या खाडीवर हा पूल बांधल्याने कुडाळ ते मालवण अंतर निम्म्याने कमी झाले आहे. मालवण हे एके काळी गजबजलेले बंदर होते. आता तेथे मासेमारीचा व्यवसाय मोठया प्रमाणात चालतो. मालवणी जेवण तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथे जेवण्याची व राहण्याची चांगली सोय आहे. मालवणी 'खाजे' हा एक वेगळा खाद्यपदार्थ पर्यटक येथून न्यायला विसरत नाहीत.
तालुक्याचे मुख्यालय असलेले हे मालवण माश्याच्या जेवणासाठी महाराष्ट्राबाहेरही प्रसिध्द आहे. आरसे महाल हे शासकीय विश्रामगृह समुद्राच्या काठालाच आहे. मालवण जवळ ओझर येथे ब्रह्मानंद स्वामींचे सुंदर मंदिर आहे. जवळच्या अंगणेवाडीची जत्रा हा साऱ्या कोकणचा कौतुकाचा विषय असतो. मुंबई मालवण अंतर ५२० किलोमीटर असून मुंबई-गोवा महा मार्गावरील कसाल गावापासून मालवण ३२ किलोमीटर आहे.

सर्जेकोट. झाडीत लपलेले गाव. जेटीवरून घेतलेले चित्र.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी त्याच्या भोवती पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, भरतगड, भगवंतगड असे छोटे छोटे गड वसवले होते.
सर्जेकोट बंदरामध्ये थांबलेल्या मासेमारीच्या होडया. होडीतून खाडीपलिकडे पसरलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर जाता येते. पलिकडे दिसतो तो तोंडवळीचा किनारा.


! "" बीजे एक वादळ "" !

" ताडोबा अभयारण्य "


विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबाच्या जंगलाला ताडोबा हे नाव येथील घनदाट जंगलात राहणा-या आदिवासी जमातींच्या तारू किंवा ताडोबा या देवदेवतांच्या नावावरुन पडले असावे असे स्थानिक लोक सांगतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प आहे. 625 स्क्वेअर किलोमिटर इतके मोठे याचे क्षेत्रफळ आहे. याचे प्रामुख्याने दोन मुख्य भाग असून 1955 पासून अस्तित्वात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि 1986 मध्ये त्यात समाविष्ट करण्यात आलेले 508 स्क्वेअर किलोमिटरचे अंधारी अभयारण्य या दोन्हींचे मिळून बनलेले आजचे हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते. त्यावरुनही याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे म्हणतात. यात प्रामुख्याने घनदाट जंगलांनी व्यापलेल्या टेकड्या या उत्तर आणि पश्चिम भागात आहेत. ताडोबा रिझर्व्ह मध्ये चिमुरच्या टेकड्यांचा परिसर येतो तर, अंधारी अभयारण्यात मोहर्ली आणि कोलसा टेकड्यांचा परिसर येतो. अंधारी नदीच्या व्यतिरिक्त असलेल्या पाणथळ जागा अर्थातच कोसला तळे जंगलाच्या मध्यवर्ती भागात आहे. ताडोबा हे मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय जंगल प्रकारांमध्ये मोडते. याचा 87 टक्के भाग अतिसुरक्षित आहे. जंगलात ऐन, बीज, धौडा, हळदू, साल, सिमल, तेंदू, बेडहा, हरडा हे वृक्ष मोठ्या प्रमाणात असून महुआ, ब्लॅक प्लम, अर्जुन फळ, बांबू अशी वनसंपदाही आढळते.
प्राणीसंपदा
ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी. सध्याच्या आकडेवारीनुसार येथे 80 वाघ आहेत. याशिवाय बिबट्या, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चीतळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. तर सरपटणा-या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे प्रामुख्याने आढळतात. इंडियन स्टार जातीचे कासवही या ठिकाणी आढळते. त्याचबरोबर पाणथळ जागेत वावरणारे आणि जमिनीवर उडणारे सुमारे 195 विविध जातींच्या पक्षांची नोंद जंगलात करण्यात आली आहे.
या जंगलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्य घोषित झाल्यानंतरही आज इतक्या वर्षांनंतर जंगलाच्या आतील भागात सुमारे 60 लहान-सहान गावे आणि पाडे वसलेले असून विविध भटक्या विमुक्त जमातींचे लोक या ठिकाणी राहत आहेत. या सर्व गावांतील लोकांची संख्या आजघडीला 41 हजार पेक्षाही जास्त आहे. त्यांच्यासाठी चंद्रपूर जल्ह्यातून अनेक ठिकाणांहून ताडोबामध्ये येण्यासाठी एसटी महामंडळातर्फे बससेवा उपलब्ध आहे. जंगलाच्या कोर आणि बफर झोन मध्ये केवळ पारंपरिक शेती करणा-यांनाच राहण्यास परवानगी आहे. आधुनिक पद्धतींच्या वापराने जंगल धोक्यात यायला नको हाच यामागे उद्देश आहे. येथील स्थानिक लोक मोहाच्या फुलापासून दारु बनवण्याचा धंदा करतात. त्यासाठी मोहाची फुले गोळा करताना तोडण्यात येणारी झाडे आणि उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेमुळे दरवर्षी 2 ते 15 टक्के जंगल जळून जाते.
ताडोबा सफरीचा अनुभव खास वाचकांसाठी

ताडोबा अभयारण्यात पहाटे साडेपाच वाजताच प्रवेश मिळते. एप्रिल महिना असल्याने पहाटेसच उजाडले होते. ताडोबा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात असल्यामुळे एप्रिलमध्ये उकाडा सुरू झालेला असतो. पण तरीही ती सकाळ मात्र प्रसन्न होती. मग भल्या पहाटे उठून आम्ही निघालो जंगल सफारीला. सुरुवातीलाच दिसला बहिरी ससाणा आणि मेन गेटजवळच्या तळ्यातील सुंदर बदके. त्यानंतर मग अनेक विविध पक्षी, रानमांजरे, रानकोंबड्या, हरणे, बारहसिंगे, नीलगायी, हत्ती असे अनेक प्राणी दिसत होते. मात्र ज्या साठी आमची नजर आसुसली होती तो जंगलचा राजा वाघोबा काही दिसेना. तशातच जंगलाचे दोन प्रमुख भाग पालथे घालून झाले आमची सकाळची पहिली राईड संपत आली होती, मात्र वाघाचे किंवा बिबट्याचेही दर्शन न झाल्याने आम्ही थोडे हिरमुसलेले होतो.

मग सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही रिसॉर्टवर परतलो. चहा-नाश्ता करुन मग दुपारी थोडा निवांत वेळ होता. कारण त्या मधल्या वेळेत जंगलच्या नियमांनुसार कोणाही पर्यटकाला जंगलात प्रवेश करता येत नाही. दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपयर्यंत अशी आणखी एक जंगल सफारी आम्ही बूक केली. पुन्हा एकदा देवाचे नाव घेतले आणि निघालो वाघाचे दर्शन घ्यायला.
त्या राईडमध्येही सुरुवातीचा एक तास खूप भटकलो. पण वाघाची काही चिन्हे दिसेनात. एकदा आम्हाला हुलकावणी देऊन तो जवळूनच निघून गेला असे कळले. त्यामुळे तर आणखीनच दु:ख झाले. तरीही आमचा विश्वास होता, की आम्हाला दर्शन होणारच. मात्र बाकी बरेचसे प्राणी दिसत होते. अगदी कोल्हा, रानडुक्कर, एका तळ्याकाळी छान पहुडलेल्या मगरी, सुसरी, विविध पक्षी, साप सारे काही. पण वाघ मात्र दिसण्याचे नाव नाही. अखेर सायंकाळी 5 वाजता एका सफारीच्याच जीपवाल्याने कळवले की, जंगलच्या मध्यावर असलेल्या तळ्यात दोन वाघ बसले आहेत. ते कळले मात्र तातडीने आम्ही आमच्या गाड्या तिकडे वळवल्या. कारण तिथे पोहोचायला आणखी 10 मिनिटे, म्हणजे तेवढ्यात ते निघून गेले तर.. पण यावेळी आमचे सुदैवच. अगोदरच त्या ठिकाणी गाड्या पोहोचलेल्या होत्या. लोकांची गर्दी झाली होती. पण आम्ही पोहोचलो आणि काय वर्णावे त्या राजबिंड्या रुपाचे वर्णन.. पहिले काही मिनिटे तर आम्ही आ.. वासून पाहात राहिलो. आजवर केवळ चित्रात किंवा टीव्हीत पाहिलेल्या वाघाला प्रत्यक्ष डोळ्यांनी आणि तेही अगदी 15 फुटांवरुन पाहतानाचा आनंद तो काय वर्णावा.. केवळ अप्रतिम.. पुढे मग त्याच्या सर्व लीला आम्ही हरखल्यागत पाहात होतो. वेळ कसा गेला ते कळलेच नाही. ते ऐटीत उठणे, ती डौलदार चाल, शिकारीसाठी धरलेला दबा, मनसोक्त फोडलेली डरकाळी.. सर्व काही अगदी लाजवाब.
ब-याच वेळानंतर मग भानावर आलो. कारण आता निघावेच लागणार होते. अर्थातच जंगलचा कायदा. तेथे आपण पाहुणे. त्या दोन्ही वाघांना अगदी डोळे भरुन पाहून घेत हळूहळू आमच्या जीप गाड्या मागे वळवल्या. पार दिसेनासे होईपयर्यंत सतत त्या तळ्याकाठी नजर जात होती. मग परतताना सुनिताबाई देशपांडे यांचा दर्शनमात्रे आठवला. चार दिवसांच्या ताडोबा सहलिचे सार्थक झाल्याचे भाव सर्वांच्या डोळ्यात होते. शेवटच्या दिवशी का होईना पण जंगलच्या राजाने आपल्याला निराश केले नाही याचाच काय तो आनंद.
पर्यटकांसाठी महत्त्वाचे
ताडोबाला कसे जाल ?
रस्त्याने - धुळे-जळगाव-अकोला-यवतमाळ-चंद्रपूर- ताडोबा
रेल्वेमार्ग - वर्धा स्थानकात सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात, किंवा मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसने थेट चंद्रपूर गाठावे. तेथून महामंडळाची बस किंवा कारने थेट ताडोबात प्रवेश करता येतो.
रहावे कुठे - ताडोबात एमटीडीसीचे लॉज आहेत. तसेच प्रायव्हेट रिसॉर्टही अनेक आहेत.


! "" बीजे एक वादळ "" !

Friday, 21 November 2014

" समर्थ स्थापीत ११ मारुती "

समर्थ स्थापीत ११ मारुती

समर्थाची मारूती स्थापना : प्रेरणा व स्वरूप
ज्ञानेश्वर,नामदेव,एकनाथ,तुकाराम आणि रामदास हे संत म्हणजे मराठी भक्तिपरंपरेच्या पंचगंगाच मानल्या जातात. परंतु रामदासांच्या भक्तिगंगेच्या प्रवाहाचे इतर संतांच्या भक्तिप्रवाहापेक्षा असलेले वेगळेपण जाणकल्याशिवाय राहात नाही.
समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर संबंध भारतभर पायी भ्रमण करून हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून तो दक्षिणेस रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली. ह्यामुळे तात्कालीन समाजस्थितीचे दर्शन त्यांना घडले. सर्वत्र हिंदूंची दैन्यावस्था त्यांनी पाहिली. राम हे त्यांचे कुलदैवत असल्यामुळे आणि राम हा सामर्थ्यसंपन्न असुमारक आणि देवतातरक असल्यामुळे तसेच तो रामराज्य प्रदान करणारा असल्यामुळे त्याची भक्ती करण्याकडे हिंदू जनतेचे मन वळवावे म्हणजेच तिची सद्यस्थितीतून सुटका होईल असा विचार त्यांनी केला. तपश्चर्या करतांना आणि त्यानंतर तीर्थाटन करतांना, रामभक्ती आणि हनुमानभक्ती यांच्या योगाने स्वत:चा उध्दार करून घ्यावा हाच त्यांचा प्रधान हेतू होता. परंतु तपश्चर्या चालू असतांना श्रीराम आणि हनुमान यांनी दर्शन देऊन कृष्णातीरी जगदुध्दार कर कर असा त्यांना आदेश दिलेला असल्यामुळे, तीर्थाटन करून आल्यानंतर त्यांनी असे ठरविले की आपल्या ओजस्वी वाणीचा, आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा आणि आपल्याला प्राप्त झालेल्या सिध्दीचा उपयोग हिंदू जनतेची मने रामभक्तीकडे वळवून तिला तिच्या दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी करावा. 'संसार क्षणभंगूर आहे, मरण केव्हातर येणारच', म्हणून आपले जीवन लोकसेवेत घालविल्यास जन्मसाफल्य होते व तीच रामाची सेवा होय
अशी शिकवण लोकांना द्यायला त्यांनी सुरवात केली. त्याचबरोबर, रामाचा संदेश पोहचवणारा सर्वश्रेष्ठ दास जो मारूती त्यांच्या ठिकाणी असलेल्या बलाची उपासना देखील लोकांना शिकवावी असेही त्यांनी ठरविले. हयासाठी लोकसंग्रह आणि लोकजागृती करणे आवश्यक आहे हे जाणून त्यांनी महाराष्ट्रात गावोगाव भ्रमण केले आणि कित्येक ठिकाणी मारूतींची स्थापना केली. लोकांना मारूतीच्या उपासनेला लावून धैर्य, वीर्य आणि बलसंपादनाची ईर्षा त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली.
समर्थांनी आपल्या तीर्थाटनामध्ये उत्तर भारतातही मारूतीमंदिरे स्थापन केली. त्यापैकी हनुमंत घाटावरील हनुमान मंदिर, तेलंगणातील हनुमानाचे मंदिर, ही मंदिरे प्रसिध्द आहेत. तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतुबंधाजवळील हनुमान मंदिरही प्रसिध्द आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी कित्येक ठिकाणी मारूतीच्या मूर्ती स्थापन केल्या. समर्थ रामदास आणि मारूती हया दोन गोष्टीचे साहचर्य लोकांच्या मनात इतके ठसले आहे की एखाद्या ठिकाणची मारूतीची मूर्ती कोणी केव्हा स्थापन केली हे माहित नसेल तर ती समर्थ रामदासांनी स्थापन केलेली असणार असे गृहीत धरले जाते. तसेच समर्थांनी स्थापन केलेली मूर्ती कोठेही असो, ती ओळखण्याची खूण म्हणजे, रातापुढे मारूतीराय असले की ते हीत जोडूनच उभे असणार आणि एकटे मारूतीराय असले की त्यांचे हात प्रहार करण्याच्या भूमिकेत असणार व पायाखाली राक्षस तुडविलेला असणार!
समर्थांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मारूतीची स्थापना केली असली तरी 'समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारूती' म्हणून जे प्रसिध्द आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत :
 हया अकरा मारूतीच्या स्थापनेचा जो काळ येथे दिला आहे त्याबद्यल मतभेद आहेत. परंतु शहापूरचा मारूती हया 'अकरा मारूतीत' पहिला याबाबत मात्र मतभेद नाहीत.
वास्तविक समर्थांनी सर्वात प्रथम स्थापिलेली मारूतीची मूर्ती गोदावरीच्या तीरावरील टाकळी येथील गोमयाची मूर्ती ही होय. तीर्थाटनाला जाण्यापूर्वी त्यांनी ही मूर्ती आपला शिष्य उध्दव याच्या मारूती उपासनेसाठी स्थापिली. परंतू हया मूर्तीचा समावेश 'अकरा मारूतीत' नाही. तसेच, सज्जनगड येथील मारूती, शिवथर घळींतील मारूती, मिरज, महाबळेश्वर, वाई, तंजावर, टेंभू, शिरगाव येथील मारूती, हयांचाही अकरा मारूतीत समावेश नाही. असे का हयाचे समाधानकारक उत्तर सापडत नाही. रामदासांच्या विशिष्ट अकरा मारूतींपैकी काहीना कदाचित राजकीय दृष्टया मोक्याच्या स्थानामुळे महत्व दिले गेले असेल, कदाचित समर्थांनी अनुग्रह दिलेल्या शिष्यांच्या आग्रहास्तव त्यांतील काहीची स्थापना केली गेली म्हणून त्यांना महत्व दिले गेले असेल, किंवा काहींना अन्य कारणास्तव महत्व दिले गेले असेल; परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या अकरा मारूतींना विशेष महत्व दिले गेले आहे ते सर्व मारूती कृष्णेच्या परिसरातील आहेत. 'कृष्णातीरी जगदुध्दार कर' हया दैवी दृष्टान्तामुळे हया कृष्णातीरीच्या मारूतींना विशेष महत्व दिले गेले असावे असाही तर्क काढता येण्यासारखा आहे.
समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात हया अकरा मारूतींच्या स्थलाबद्दल उल्लेख आहे :-
चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक । पारगावी देख चौथा तो हा ॥
पांचवा मसूरी, शहापुरी सहावा। जाण तो सातवा शिराळयांत॥
सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा। दहावा जाणावा माजगावी॥
बाहयांत अकरावा येणेरीती गावा। सर्व मनोरथा पुरवील॥
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥

समर्थांचे हे अकरा मारूती जागृत देवस्थाने आहेत असे मानले जाते. हया अकरा मारूतींना 'वारीचे मारूती' असेही म्हणतात.
संदर्भग्रंथ - समर्थ स्थापित अकरा मारुती

! "" बीजे एक वादळ "" !


" सुंदरनारायण मंदीर "

सुंदरनारायण मंदीर

नाशिकचे वैशिष्टय असणारे सुंदरनारायण मंदीर हे गोदावरीकाठी अहिल्याबाई होळकर पुलाजवळ आहे.
सुंदरनारायणाचा पुराणात उल्लेख आहे. वृंदादेवी ही अतिशय सुंदर व सुशील असणारी स्त्री जालंदर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. जालंदर दुष्ट राक्षस होता. परंतु तो शंकराचा परम भक्त होता. वृंदादेवीची पुण्याई व जालंदरची भक्ती ह्यावर प्रसन्न होऊन शंकराने त्याला अमर होण्याचे वरदान दिले. वरदान मिळाल्यावर जालंदर आणखीनच अहंकारी झाला व पृथ्वीवरच्या मानवांना तसेच स्वर्गात देवतांना त्रास देऊ लागला. इतकेच नव्हे तर खुद्द भगवान शंकरा बरोबर जालंदराने वाद छेडला. असह्य होऊन भगवान विष्णुनी त्यास ठार मारायचे ठरविले.
विष्णू जालंदाचे रूप धारण करून वृंदा देवी बरोबर राहू लागले. अश्या त-हेने वृंदादेवीचे पवित्र्य धोक्यात आहे व तिची पुण्याई संपुष्टात आली. त्यामुळे जालंदरला मारण्यात विष्णूला यश आले. वृंदादेवीला विष्णूची चलाखी लक्षात येताच ती अतिशय संतापली. तिने विष्णूला शाप दिला त्यामुळे भगवान विष्णू पूर्ण काळे पडले. विष्णूंनी गोदावरीत स्नान करून आपली काया परत मिळावली व पूर्वी इतकेच सुंदर ते दिसू लागले. म्हणूनच भगवान विष्णूंना नाव प्राप्त झाले सुंदरनारायण.
नाशिकचे सुंदरनारायण मंदीर १७५६ साली गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी बांधले. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेस आहे. कपालेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून बरोबर पश्चिम दिशेला पाहिले की सुंदरनारायण मंदिरातील मूर्तीचे दर्शन घडते. व्हिक्टोरिया पुलाजवळ असलेल्या या मंदिराची रचना भृगशिल्पानुसार आहे. मंदिराचे बांधकाम हे अतिशय आकर्षक असून त्यावर मोगल शैलीचा पगडा दिसून येतो. कारण त्याकाळात बरीचशी मंदिरे मुसलमानांनी नष्ट करून त्याजागी कबरी बांधल्या होत्या. मंदिराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे दरवर्षी २१ मार्च रोजी सूर्योदयाच्या वेळी सूर्य किरणे प्रथम मूर्तीवर पडतात. त्याकाळच्या वास्तूशिल्पाचा हा चमत्कारच म्हटला पाहिजे विष्णूच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस लक्ष्मी व उजव्या बाजूस सरस्वती विराजमान आहे.
देवाळाजवळ नदीच्या दिशेने बद्रीका संगम नावाचे कुंभ आहे असे म्हणतात की, देवगिरी राजाने ह्या कुंभात आंघोळ करून सर्व विधी पार पाडले. ह्या कुंभाचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सुध्दा आपल्याला आढळतो. असे हे पुरातन मंदीर निश्चितच भेट देण्याजोगे आहे.


! "" बीजे एक वादळ "" !

" करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर "

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर

अनेक पुराणांमधे श्री महालक्ष्मीचा उल्लेख आढळतो. जवळपास ४० किलो वजनाच्या मौल्यवान पाषाणाचा वापर करून देवीची मूर्ती बनविली आहे. हा पाषाण हिरक कणांनी मिश्र आहे. त्यातून मूर्तीचे पुरातनत्त्व सिध्द होते. मूर्तीचे आकारमान शिवलिंगाशी मिळते जुळते आहे. देवीची मूर्ती एका चौकोनी दगडावर उभी असून त्यात वालुका तसेच हिरक सापडतात. श्री. महालक्ष्मी मूर्तीच्या मागे सिंह प्रतिमा आहे. मध्यभागी सहाजिकपणे पद्मरागिणी आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. वरच्या दोन हातांमध्ये तिने बांबूची ढाल व तलवार धारण केली आहे, तर म्हाळूंगाचे फळ खालच्या उजव्या बाजूच्या हातात तर डाव्या हाती पानाचे तबक धरले आहे. मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आहे. मुकुटावर, भगवान विष्णुची बैठक असणारा फणाधारी शेषागं आहे. हा शेषांग ५ ते ६ वर्षांपूर्वीचा आहे, असा संशोधकांचा कयास आहे. इ. सन. पूर्व १००० पासून मौर्यांची राजवट होती. तर इ. सन. ३० पासून राजा कर्णदेव कोकणातून कोल्हापूरास आला व राज्यकर्ता झाला. त्याकाळी एका छोटया मंदिरामधे ही मूर्ती होती.
कर्णदेवाने आजूबाजूचे जंगल तोडले वे हे मंदिर उजेडात आणले. १७ व्या शतकानंतर, अनेक रथी-महारथींनी या मंदिरास भेट दिली व त्यानंतर हया मंदिरास प्रसिध्दी लाभली. श्री. महालाक्ष्मी ही अखिल महाराष्ट्राची देवता बनली. कोल्हापूरास देवस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले. या परिसरामधे जवळपास ३५ लहानमोठी देवळे असून, एकंदर २० दुकाने आहेत. हेमाडपंती शैलीने बांधलेल्या या मंदिराचे ५ कळस आहेत. 'गरूड मंडप' हा या मंदिराला लागूनच जोडलेला मंडप आहे.
रात्रौ ठीक १० वाजता देवीची शेजारती होते, त्यावेळी देवीला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवतात. देवीच्या शयनगृहात आरती होते, व त्यावेळी 'निद्राविध' गीते गातात. त्यानंतर दिनक्रम संपवून, प्रमुख आणि उपदरवाजे बंद करतात. दिवसातून एकंदर ५ वेळा देवीची आरती करतात. तसेच महाकाली, मातुलिंग, श्री. यंत्र, महागणपती आणि महासरस्वती यांची सुध्दा आरती व नैवेद्य करतात. दर मंगळवारी व शुक्रवारी आरतीला भाविकांची गर्दी वाढते. मंदिराच्या आवारातील सर्व लहान-मोठया ८७ देवालयांमधे आरती होते. काही भाविक एकापेक्षा जास्त आरती सोहळयांना हजर राहतात. प्रत्येक आरतीला सरासरी १८३ भाविक असतात. आकारती व पंचारती करताना चांदीचा दिवा वापरतात, तर कापूर-आरती करताना, पितळेचा दिवा वापरताता. महालाक्ष्मी मंदिराच्या दैनंदिन आचार विधींमधे, आरती ही सर्वात महत्त्वाची आहे. रोज पहाटे ४ वाजून ३०  मिनीटांनी मंदिर उघडल्यावर, मूर्तीची पाद्यपूजा झाल्यावर, काकडारती करतात. यावेळी भूप रागातील गीते म्हणतात. सकाळी ८ वाजून ३०मिनीटांनी, महापूजा झाल्यावर 'मंगल-आरती' करतात. सकाळी ११.३०  वाजता देवीला सुवासिक फुले, कुंकुम वाहतात. तेवणारा कापूर देवीसमोर धरून तिला नैवेद्य दाखवतात. भाविकांमार्फत कोणी महापूजा घातली नसेल तर, (दूध, दही, साखर, तूप व मधाच्या) पंचामृताऐवजी दूधाने देवीची पाद्यपूजा करतात. दूपारी २ वाजेपर्यंत ही प्रक्रीया सुरू राहते. त्यानंतर अलंकारांसहीत देवीची पूजा करतात. मंदिराच्या अंतर्गृहात वेदातील मंत्रोच्चारण होते. संध्याकाळी ७.३०  वाजता, दुमदुमणा-या घंटानादाच्या साक्षीनं देवीची आरती होते. याला भोग आरती म्हणतात. दर शुक्रवारी रात्री देवीला नैवेद्य दिला जातो. आरती नंतर देवीचे अलंकार पुन्हा देवस्थानच्या खजिन्यात जमा करतात.
मंदिरातील हया नित्याच्या आरत्यांव्यतिरिक्त, त्रयंबूली जत्रा, रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळ अष्टमी, किरणोत्सव इ. उत्सव प्रसंगी आणखी एक आरती करतात. श्री. शंकराचार्य, आणि श्रीमान् छत्रपती ज्यावेळी देवळास भेट देतात, त्यावेळी खास आरती करण्याची प्रथा आहे. कार्तिक महिन्यात दिवाळीपासून तो, पौर्णिमेपर्यंत उत्सव करतात. हजारोंनी पुरूष व महिला ज्यास भेट देतात, तो हा उत्सव पाहण्यासारखा आहे.

संपर्क : महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळा,
कपिलतीर्थ मार्केटजवळ, ताराबाई मार्ग,
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत,
दूरभाष : ९१-२३१-६२६३७७
kolhapurdistrict.org च्या सौजन्याने

 

! "" बीजे एक वादळ "" !

" जोतिबा "

जोतिबा

सुप्रसिध्द १२ जोर्तिलिंगांपैकी हे एक मंदिर आहे. याला 'केदारनाथ' आणि 'वाडी रत्नागिरी' ही देखील दोन नावे आहेत. माता महालक्ष्मीच्या दानवांबरोबर झालेल्या युध्दामधे जोतिबाने तिला मदत केली आशी आख्यायिका पुरांणांमधे सापडते. हया डोंगरावरती त्याने आपले राज्य स्थापन केले. नाथ पंथीयांचे हे विख्यात दैवत आहे. जोतिबाचा जन्म चैत्र शुक्ल षष्ठीस, पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा हयांच्या पोटी झाला.

कोल्हापूरच्या उत्तरेस, उंचच उंच सुळके आणि हिरव्यागार पर्वतराजींच्या सान्निध्यात, जोतिबाचे देऊळ वसले आहे. इ. सन १७३० मधे, नवाजिसायाने मूळ मंदिर बांधले. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ३३० फूट आहे. आतील मूर्ती चतुर्भुज असून सजावट प्राचीन आहे. त्या परिसरामधे इतर काही मंदिरे व दीपमाळा आहेत. चैत्री पौर्णिमेस इथे भरणाऱ्या जत्रेला अनेक भाविक गर्दी करतात. या यात्रेकरूंच्या हातात, उंच काठया (शासन) असतात. उधळलेल्या गुलालाच्या रंगाने जोतिबाचा अवघा डोंगर गुलाबी झाला आहे. याचा शुभवार रविवार आहे. हया देवस्थानामधे भाविकांकडून तसेच सरकारी पातळीवरूनदेखील बरीच सुधारणा झाली आहे. इथेच एक नवी योजना हाती घेऊन, 'प्लाझा गार्डन' विकसित केली आहे.

! "" बीजे एक वादळ "" !

" चांदवड "

चांदवड

महाराष्ट्रात मालेगावच्या जवळ असलेले चांदवड हे एक छोटेसे गाव. पर्वतांनी वेढलेलल्या गावास  धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. चांदवड शहरात फिरायला गेल्यास तिथे आपणास अहिल्याबाई होळकर यांचा रंगमहाल, रेणुका माता मंदिर पहावयास मिळते. तसेच नजीकच्या वडाळीभोई गावाकडे गेल्यास केद्राई माता मंदिर लागते.
रंगमहाल : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हा महाल स्वत:साठी बनवला होता. या महालात वास्तव्यास असतांना  अहिल्याबाई रेणुका मातेच्या दर्शनास जात असत तसेच विंचूरजवळ असलेल्या विहिरीवरही भेट देत असत. तिथे शत्रूंपासून बचावासाठी सुरक्षित जागा केलेली होती.
रेणुका माता मंदिर : ऋषी परशुरामांनी वडिलांच्या आदेशावरुन आई रेणूका मातेचा वध केला. रेणूका मातेचे मुख चांदवड शहरात व धड माहूर गावाजवळ पडले. त्यामुळेच चांदवडला रेणूका मातेचे मंदिर बांधण्यात आले.
केद्राई माता मंदिर :  वडाळीभोई पासून दक्षिणेला ५ किमी खडकओझर गावाच्या शिवारात हे मंदिर आहे.  अपत्य प्राप्तीसाठी अनेक जोडपे केद्राई मातेजवळ नवस करतात. यावेळी नवस फेडण्यासाठी बोकड बळी दिला जातो. प्रत्येक पौर्णिमेला व अमावस्येला या ठिकाणी यात्रा भरते.  या वेळेस हजारो भाविक नवस करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.  मंदिराच्या बाजूलाच केद्राई धरण असून ते पण फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी अतिशय थंड वातावरण असते.
कसे जाल?
नाशिक पासून चांदवड ६४ किमी लांब असून खाजगी वाहनांनी दिड तासात पोहोचता येते. येथे जाण्यासाठी नाशिकहून बस तसेच छोटया गाडयांची सोयही उपलब्ध आहे.

! "" बीजे एक वादळ "" !


" सप्तश्रृंगी देवी वणी "

सप्तश्रृंगी देवी वणी

हिंदू पंचागांप्रमाणे साडेतीन मुहूर्त महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा व अक्षयतृतीया. तसेच महाराष्ट्रातील देवींची पुढील प्रमाणे साडेतीन पवित्र स्थाने प्रसिध्द आहेत. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाभवानी, माहूरची कुलस्वामीनी ही तर भाविकांच्या श्रध्देची स्थाने आहेत. साडेतीननावे पवित्र क्षेत्र सप्तश्रृंग गडाची देवी भगवती, महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून ५५ किलोमीटर्स दूर आहे. नांदूरी गांव सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी आहे. वर जायला ११ किमी. चा रस्ता घाटातून जातो. ज्या गडावर देवीचे देऊळ आहे. त्या गडाला सात शिखरे आहेत. सप्तश्रृंगीगड निवासीनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो. देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर उभा आहे. सप्तश्रृंग गडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत. रामायणातील एका ऋचेनुसार हनुमानाने याच डोंगरावरून जखमी लक्ष्मणाच्या उपचारासाठी एक मुळी नेली होती. वणीच्या गडावर शिवालय तीर्थ, शीतला तीर्थ, व कोटी तीर्थ अशी एकूण १०८ पवित्र कुंडे आहेत.
प्रचंड शीतकडा
तीर्थाच्या पुढे एक प्रचंड दरी शीतकडा म्हणून उभी आहे. ती सुमारे १५०० फूट खोल असावी. एका सवाष्णीने 'मला पूत्र होऊ दे भगवती, मी कडयावरून बैलगाडीत बसून उडी घेईन' असा नवस देवीस केला होता. देवीच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. त्या स्त्रीने आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून शीतकडयावरून खोल दरीत उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजुनही शीतकडयावर पाहता येतात. हा प्रसिध्द शीतकडा समुद्र सपाटीपासून ४६३८ फूट उंच आहे. वणीच्या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७० पाय-या चढून जाव्या लागतात. इ.स. १७१० मध्ये या पाय-या उमाबाई दाभाडे यांनी बांधून घेतल्याची नोंद आहे.
देवीची मूर्ती
सप्तश्रृंगी देवी खानदेशी देवी म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागातून भाविक फार येतात. मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला १८ हात आहेत. ती पाषाण मुर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचीत कललेली मान, आठरा हातात आठरा विविध आयूधे असा देवीचा थाट आहे. ४७० पाय-या चढल्याचे देवीच्या प्रसन्न दर्शनाने सार्थक होते. हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात. दर पौर्णिमेला व नवरात्रात येणा-या भविकांनी गड गजबजून जातो. चैत्री पौर्णिमेला सुमारे एक लाखाच्या वर भाविक गोळा होतात. मोठी यात्रा भरते. जत्रेचा आनंद भक्तगण लुटतात. देवीचा गाभारा ओटीचे खण, नारळ व साडयांनी भरून जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली होती. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या अठरा हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला 'महिषासूरमर्दिनी' असेही म्हणतात.
ध्वज महात्म्य चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता भगवतीच्या देवळावर ध्वज फडकला की भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढया उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे त्यालाही आकलन होत नाही. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहनी उत्तरेकडे फडकत राहतो. स्वामी प्रकाशानंद सरस्वती यांनी धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदि यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ चालू असतो. भगवती नवसास पावते म्हणून भक्तांचा सतत ओघ येथे येतो. विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीया नवस करतात. तसेच इतर पिडा टळावी म्हणून देवीला सांकडे घालतात.
नवीन सुविधा गेल्या पाच वर्षात सप्तश्रृंग गडाचा कायापालट करण्यात आला आहे. पाय-यांवर छप्पर आले आहे तर आजूबाजूला कठडे बांधण्यात आले आहेत. वर जायचा व यायचा रस्ता वेगवेगळा आहे. वर चढतांना दम लागल्यानंतर थांबायला विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आल्या आहेत. धर्मशाळेत उतरण्याची चांगली सोय आहे. गाद्या व ब्लकेटस् पुरविली जातात तर नाममात्र किंमतीत जेवण्याची सोय ट्रस्टने काली आहे. सप्तश्रृंग गडावर एक छोटे नगर वसले गेले आहे. पाण्याची नवी टाकी तयार करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवासासाठी खास विश्रामगृहे बांधली आहेत. देवीची फोटो, पुस्तके, प्रसाद तसेच पुजेचे साहित्य या सर्व गोष्टी लगेच मिळतात. पूजा सांगायला तसेच विविध विधी करायला पुरोहीत वृंद हजर असतो. घरगुती जेवणही गुरुजींकडे मिळू शकते. एकूण काय भक्त मंडळी प्रसन्न होऊनच परत जातात.

! "" बीजे एक वादळ "" !

" तुळजाभवानी "

तुळजाभवानी देवी - तुळजापूर

tuljabhavaniभारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.
स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे.
देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.
तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होते. तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. नवरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते. या विधीस मोठे महत्त्व आहे. तसेच नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री भवानी मातेचा जागर होतो. प्रशाळपूजेनंतर देवीला विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटस्थापन करण्यात येते. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
तुळजापूरस्थित भवानी मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. भवानी मातेचे मंदिर खोलगट भागात आहे. मंदिराकडे जाण्यासाठी उताराचा रस्ता आहे. या मंदिरात प्रवेश करताच डाव्या हाताला तीर्थकुंडे आहेत. एकशे आठ झ-यांचे उगमस्थान असणारी ही तीर्थकुंडं कल्लोळतीर्थ व अमृतकुंड या नावांनी ओळखली जातात. मंदिराच्या उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. भाविक मंदिरात प्रवेश केल्यावर या सर्व देवतांचे दर्शन घेत दत्तपादुकांजवळ येऊन पोहोचतात. गाभा-याजवळील गणेश मूर्तीचे दर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर गाभा-या समोरील पाच पाय-या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती पध्दतीचे आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.

! "" बीजे एक वादळ "" !


" भीमाशंकर मंदिर "

भीमाशंकर मंदिर, ता. खेड, जि. पूणे

tuljabhavani भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. या ज्योतिलिंर्गामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.
हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभा-यातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
गुप्त भीमाशंकर - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिलिंर्गात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूवेर्ला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
कोकण कडा - भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.
सीतारामबाबा आश्रम - कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते

नागफणी - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.

! "" बीजे एक वादळ "" !

" भंडारदरा धबधबा "

डारदरा हे नाशिकपासून ७० कि.मी. वर असणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. भंडारद-याचे खरे सौंदर्य हे पावसाळयानंतर अधिक खुलते, नाहीतर इतर वेळेला हा भाग अगदी रखरखीत असतो. १९२६ साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे. इथला 'छत्री' (umbrella) धबधबा हा अतिशय सुंदर व मनोहर आहे. भंडारद-यापासून ११ कि.मी. वर रंधा धबधबा आहे. हा धबधबा ४५ मीटर उंचीवरून खाली कोसळतो. त्यामुळे हे दृश्य सुंदर असून सुध्दा भीतीदायक वाटते. हा धबधबा पाहण्याकरिता पर्यटकांसाठी सुरक्षित सोय केली आहे. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांना भंडारद-यापासून कळसूबाई शिखर खूपच जवळ आहे. महाराष्ट्रातले उंच असणारे हे शिखर समुद्रसपाटी पासून १,६४६ मीटर उंच आहे. हा भाग दाट जंगल-झाडींनी वेढलेला आहे. विविध प्रकारचे वन्य प्राणी व पक्षी येथे सहजपणे आढळतात. रस्ता घनदाट जंगलातून जात असल्यामुळे गिर्यारोहकांनी स्थानिक वाटाडयांची अथवा पुस्तकांची मदत घेतलेली अधिक चांगली. जवळ अमृतेश्वर देऊळ आहे. येथे शंकराची पुरातन पिंड आहे. अमृतेश्वरला बोटीने जावे लागते. येथूनच पुढे रतनगड किल्ला आहे. हा किल्ला फारसा वैशिष्टयपूर्ण नसला तरी पर्यटकांसाठी भेट देण्याजोगा आहे. भंडारदऱ्यापासून २२ कि.मी. असणारे 'घाटघर' ठिकाण थरारक ड्रायव्हींगची आवड असणा-यासाठी योग्य आहे. पावसाळयात ह्या भागात संपूर्णत: धुके असते. तसेच घाटघर कडे जाणारा रस्ता खाचखळग्यातून जाणारा निमूळता रस्ता आहे. त्यामुळे चालक रस्ता चुकण्याची शक्यता अधिक आहे. भंडारदरा येथे महाराष्ट्र पर्यटक मंडळाने राहण्याची व जेवण्याची उत्कृष्ट सोय केली आहे. मंडळाची रहाण्याची सोय तळयाकाठी असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. राहण्याची सोय दूरध्वनी (६२८१६९, ६२६८६७) वरून होऊ शकते. आता काही खाजगी हॉटेल्सची सोय सुध्दा उपलब्ध आहे. भंडारदारा येथे तुम्हाला उच्चप्रतीची राहण्याखाण्याची सोय कदाचित मिळणार नाही पण निसर्गाचा आनंद मात्र मनमुराद लुटता येईल.


"" बीजे एक वादळ "" !

" बारा ज्योतिर्लिंगे "


सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम्
उज्जयिन्याम् महाकालम् मोंकालममलेश्वरम् |
परल्यां वैजनाथं च डाकिंन्यां भीमशंकरम्
सेतुबंधे तु रामेशं, नागेशं दारुकावने |
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे
हिमालये तु केदारम् घृशुणेशं शिवालये
एतानि द्वादश ज्योतिर्लिंगानी सायंप्रात: पठेन्नर:
सप्तजन्मकृतपापं स्मरणेन विनश्यति | ||

१) सोमनाथ - सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.
२) मल्लिकार्जुन - गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍िरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
३) महाकाळेश्वर - उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.
४) अमलेश्वर - ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.
५) वैद्यनाथ - शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
६) भीमाशंकर - भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.
७) रामेश्वर - दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.
८) नागेश्वर - श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
९) काशीविश्वेश्वर - वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.
१०) केदारेश्वर - हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
११) घृष्णेश्वर - (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.
१२) त्र्यंबकेश्वर - नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।

॥शाहू राजवाडा ॥

नवा राजवाडा (शाहू म्यूझियम) : दसरा चौकातून शहराच्या उत्तरेकडील भागात तीन कि. मी. अंतरावर नवा राजवाडा मोठ्या डौलाने उभा आहे. या राजवाड्याचा नकाशा मेजर मँट या वास्तुशिल्पकाराने बनविला आहे. आणि तो तयार होण्यास सन १८७७ ते १८८४ असा सात वर्षाचा कालावधी लागला. त्याकाळी त्याची किंमत सुमारे सात लाख रुपये होती. याची दर्शनीय बाजू दक्षिणेला असून राजवाड्याच्या मध्यभागी असलेल्या उंच मनोऱ्यावर एक भलं मोठं घड्याळ चारही दिशेने वाढत असलेल्या करवीर नगरीची शान पाहत आहे. या मनोऱ्याची उंची १३५ फूट आहे. राजवाड्याच्या एका बाजूला दरबारगृह व बिलिअर्ड खेळण्याची खोली असून दूसऱ्या बाजूला दोन मोठ्या खोल्या स्वागत प्रतिक्षेसाठी आहेत. मागील बाजूस मोठा खुला चौक असून त्याच्या मध्यभागी एक कारंजा आहे. मुख्य राजवाडा दुमजली असून त्याच्यावर लहान मोठे मनोरे व घुमट आहेत. मिश्र शिल्पकलेचा हा एक उत्कृष्ट व तितकाच सुंदर नमुना आहे. हा राजवाडा, त्या समोरील छोटा तलाव, तलावाकाठी छोटे राखीव जंगल आणि त्यातून हिंडणारी हरणे व इतर प्राणी, वाड्याभोवतालचा रम्य परिसर मनाला मोहविणारा आहे.श्रीमंत छत्रपतींचे हे निवासस्थान. राजवाड्याच्या काही भागात सध्या शाहू महाराजांच्या काळच्या ऐतिहासिक वस्तू व शिल्प यांचे संग्रहालय करून स्मारक म्हणून राखून ठेवले आहे. छत्रपती शाहूंची मौल्यवान छायाचित्रे व पेंटिग्ज, त्यांनी शिकारीसाठी व लढाईमध्ये वापरलेल्या बंदुका व अन्य शस्त्रे, शिकारीत मिळालेली जनावरे आकर्षक पध्दतीने मांडलेली आहेत. या राजवाड्यातील भव्य दरबार हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने चितारलेले आहेत. पूर्वी दरबार भरत असताना ज्या पध्दतीने सजवला जात असे त्याच पध्दतीने सजवून तो प्रेक्षकांपुढे मांडलेला आहे, हे दरबार हॉलचे वैशिष्ट्य. राजवाड्याचा परिसरही उद्याने व हिरवळीने नटलेला आहे. हे म्युझिअम सोमवारी बंद असते. इतर दिवशी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत खुले असते.जुना राजवाडा (भवानी मंडप) :शहराच्या मध्यवस्तीत व महालक्ष्मी देवालयाच्या सान्निध्यात असलेला हा राजवाडा सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधला गेला. त्यानंतर अनेकवेळा त्यात सुधारणा केल्या गेल्या. सन १८१३ मध्ये त्याचा काही भाग पुन्हा बांधण्यात आला. राजवाड्याचा पुढील भाग तर संपूर्णपणे बऱ्याच कालातंराने बांधला गेला आहे. हा राजवाडा दुमजली असून मध्यभागी मोठा हॉल आहे. येथे श्री. महालक्ष्मी (तुळजा भवानी) च्या प्रतिमेची स्थापना केली आहे. या हॉलचा उपयोग दरबारगृह व खाजगी धार्मिक विधीकरता होत असे. राजवाड्याखेरीज इतर विस्तारित भागांचा उपयोग संस्थान काळात निरनिराळया संस्थानी कार्यालयासाठी म्हणून होत असे. सध्या या विस्तारित इमारती पोलिस स्टेशन, कोर्ट, एन. सी. सी. ऑफिस, शेतकरी बझार, राजाराम हायस्कूल, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल वगैरे करिता वापरल्या जातात. राजवाड्यासमोर एक मोठा मंडप असून त्याला भवानी मंडप असे म्हणतात. भवानी मंडप हे सध्या सिटी बसेसचे एक केंद्र आहे. या राजवाड्याच्या उत्तरेला जुन्या पध्दतीची पाच मजली वास्तू आहे. याचा वापर नगारखान्याच्या वास्तूला तीन मोठ्या कमानी आहेत. मधल्या हॉलमध्ये जो पूर्वी दरबारी थाट होता तो अलिकडच्या काही वर्षात पहावयास मिळत नाही व इथून पुढे मिळणारही नाही. सध्या तेथे एक गवा रेडा आणि वाघ, सांबर आदि कांही प्राणी भुसा करुन उभे केलेले आहेत. रान- रेडा सध्याच्या छत्रपतींनी सुमारे ३० - ३५ वर्षापूर्वी मारला होता. ही एकच काय ती निशाणी राहिलेली आहे. बाकीचा सर्व वैभवी थाट लोप पावलेला आहे. शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान :कोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिध्द आहे. श्री. शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे. या खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या, असंख्य पैलवान या मातीत नावारुपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळयांचे पारणे फेडले. हे मैदान मंगळवार पेठेत असून जुन्या राजवाड्यापासून चालत पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मैदान अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून अशा प्रकारचे मैदान क्वचितच असेल. याचा आकार पूर्ण गोलाकृती असून मध्यभागी कुस्ती खेळण्याचा मोठा आखाडा आहे. या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कुस्त्या केल्या जातात. सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी म्हणून उतरण आहे. या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट तबकासारखा दिसतो. पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशाची सोय आहे. पूर्वेला निमंत्रित व मान्यवर व्यक्तींना बसणेकरिता मोठा मंच असून त्यावर मंडप उभारलेला आहे. या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा इतर कार्यक्रमासाठीही केला जातो. आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक अंतराच्या आत येऊ नये म्हणून दोन वर्तुळकार लोखंडी कठडे तयार केलेले आहेत. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असून त्यालगतच केशवराव भोसले नाट्यगृह आहे.केशवराव भोसले नाट्यगृह :सध्या कोल्हापुरात असलेले हे नाट्यगृह सुमारे ९० वर्षापासून उभे आहे. महाराष्ट्रातील हे सर्वात जुने नाट्यगृह होय. या नाट्यगृहाची उभारणी राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रेरणेने झाली. पूर्वी यास पॅलेस थिएटर या नावाने ओळखत असत. याच्या बांधकामास ९-१०-१९१३ रोजी सुरवात झाली. १४-१०-१९१५ रोजी याचे बांधकाम पूर्ण झाले. नाट्यगृहाचे रंगमंच भव्य चौकोनासारखे असून ते ७२० फूट आकाराचे आहे. रंगमंचाखाली १० फूट खड्डा असून त्यात पाणी आहे. पूर्वी ही विहीर होती असे म्हणतात. रंगमंचाखाली पाणी ठेवण्याचा उद्देश आवाज घुमावा हा आहे. हे या नाट्यगृहाचे एक खास वैशिष्ट्य आहे. पाणी खेळविण्यासाठी पक्की गटारे बांधली आहेत. रंगमंचाच्या पूर्वेकडील बाजूस दोन रंगपटगृहे आहेत. भक्कम फळया घालून रंगमंच बांधले आहे. नाट्यगृहात कोठेही खांब नाहीत त्याकाळी बांधलेल्या बहुतेक नाट्यगृहात खांब फार असत व त्यामुळे काही प्रेक्षकांना रंगमंचावरील पूर्ण भाग पाहता येत नसे. कलाकार, प्रेक्षक व आवाजाचा अंदाज घेऊन हे नाट्यगृह बांधले असल्यामुळे कोठूनही पूर्ण रंगमंच दिसतो व संभाषण चांगले ऐकू येते. पीटाच्या पहिल्या रांगेतील प्रेक्षक व रंगमंच यामध्ये सुमारे ८० फूट अंतर आहे. माडी प्रशस्त व खानदानी वाटते. बसण्याची जागा चांगली रुंद आहे. पूर्वी माडीवर दोन्ही बाजूस राज घराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी दोन चष्मे (बंदिस्त खोल्या) ठेवण्यात आले होते. गोषातील स्त्रिया येथून नाटके पाहत. अलिकडे नाट्यगृहात अंतर्बाह्य खूपच सुधारणा झाल्या आहेत.नाट्यगृहाच्या सभोवताली प्रशस्त मोकळी जागा असलेने त्यांच्या सौंदर्यात भर पडली आहे. या आवारात कोल्हापूरचे सुप्रसिध्द अभिनेते कै. अरुण सरनाईक यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. एका कारंज्याचीही रचना केलेली होती, पण हे कारंजे सद्यस्थितीत बंद आहे. नाट्यगृह रस्त्यापासून थोडे बाजूला व रस्त्याच्या पातळीपासून खाली असल्याने बाहेरच्या गलबलाटाचा नाटकावर परिणाम होत नाही. एकंदरीत नाट्यगृहाची रचना व सोयी या दृष्टीने ज्या काळात नाट्यगृह बांधले त्याचा विचार केला तर तर अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही.हे नाट्यगृह बांधण्यापूर्वी कोल्हापुरात लक्ष्मी प्रसाद, शिवाजी व श्री. मेंढे यांचे शनिवार थिएटर अशी तीन नाट्यगृहे चालू होती. राजश्री शाहू छ. महाराज हे कलांचे रसिक भोक्ते व उदार आश्रयदाते होते. कोल्हापुरात नव्हे तर महाराष्ट्रात नाट्य व संगीत कला यांच्या वाढीस शाहू महाराजांचे सहाय्य कारणीभूत झाले. १९०२ मध्ये शाहू महाराज विलायतीला गेले. तिकडील विशेषत: रोममधील कुस्त्यांची मैदाने व पॅलेस थिएटर यांच्या रुपाने प्रगट झाले. पॅलेस थिएटरचे उद्घाटन त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांचे हस्ते झाले. थिएटरचे अनावरण १९१५ साली दसऱ्यास किर्लोस्कर संगीत नाटक मंडळींच्या मानापमान या नाटकाचा प्रयोग होऊन झाले. किर्लोस्कर नाटक कंपनीबरोबर राम गणेश गडकरीही आले होते.स्वातंत्र्यानंतर या नाट्यगृहाचे पूर्वीचे नाव पॅलेस थिएटर बदलून केशवराव भोसले नाट्यगृह असे ठेवण्यात आले. कोल्हापूरच्या केशवराव भोसले या नामवंत नटाचे नाव या नाट्यगृहास देऊन त्यांचा गौरव केला गेला. त्यांची दोन तैलचित्रे रंगमंचावर लावण्यात आली आहेत.

Thursday, 20 November 2014

॥ कोकणकन्या म्हणजे कोकण रेल्वेचे अप्रतिम सौंदर्य ॥

निसर्गावर असंख्य जणानी कविता लिहिल्या असतील...अगदी पाला पाचोळ्या एवढ्याबेसुमार...त्यातलेच हे एक छोटे पान...फरक एवढाच की ही कविता कोकण रेल्वेत बसून , निसर्गाला साक्षठेवून - रेल्वे तिकिटाच्या मागच्या बाजूवर लिहिलेली...

हिरवळिच्या चौकोनात उमटले वर्तुळ पाण्याचे
ओले सप्तसुर निनादले जल-धारांच्या गाण्याचे

आभाळाला लटकती उंच नारळाच्या पेंडया 
ढग खाली वाकून ओढती डोंगराच्या शेंड्या

गवताच्या तलवारीवर जडले पाण्याचे मोती
झाडे रांगती न्हाउनीधरणीची पिल्ले छोटी

वारयाची शर्यत वेळेशीप्रकाशाला धुक्याचे कोंदण
नदीची वळणे नागमोडीकातळाला झरयाचे गोंदण

लाल तांबड्या मातीतनिळे थेंब झिरपले
हिरव्या रंगात हरवूनीमन वेडे हरपले.