महाबळेश्वर
मुंबई-गोवा महामार्गावर जाताना महाड सोडल्यावर डावीकडच्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये रायेश्वर, महाबळेश्वर, कोल्हेश्वर अशी एकापेक्षा एक उत्तुंग पठारे लागतात. यापैकी महाबळेश्वर हे ब्रिटीश कालातच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्दीस आले होते. ब्रिटीशांनी या ठिकाणाला मुंबई प्रांताची उन्हाळयातील राजधानी म्हणून विकसीत केले होते. या ठिकाणी येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग (पोलदपूर मार्गे) हा सोयीचा मार्ग आहे. या शिवाय मुंबई-पुणे किंवा मुंबई-बँगलोर महामार्गावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर वाई-पाचगणी मार्गे महाबळेश्वर गाठता येते.चेरापुंजी नंतर भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे हे दुस-या क्रमांकाचे ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळयात महाबळेश्वर बहुतांशी चार महिने बंदच असते. महाबळेश्वर ते प्रतापगड मधले घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचे खोरे. अफझलखानाचा प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वध केल्यानंतर मराठयांनी आदिलशाही फौजेला याच जावळीच्या खो-यात धूळ चारली होती.
येथील सर्वात जुने ठिकाण म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर. या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी ही महाराष्ट्रात इतर कुठेही न आढळणारी फळे आपल्याला महाबळेश्वरला मिळतात. इथला मधही चांगला असतो.
पाच पर्वतांनी वेढलेले पाचगणीही इथून जवळच आहे. येथील प्रसिध्द टेबलटॉप पठार, ब्रिटीश आणि पारशी पध्दतीची घरे, हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर यामुळे हे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीस उतरते. तसेच महाबळेश्वरहून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेले तापोळे हे नव्याने उदयास आलेले, शिवसागर तलावाच्या काठावर असलेले ठिकाण आहे.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सुपरिचीत आहे. माणसांचीही इथे सतत वर्दळ असते त्यामुळे राहण्याची-जेवण्याची सोय असलेली भरपूर हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. याशिवाय एम.टी.डी.सी. चे बंगलेही आहेत. खिशाला परवडण्याजोग्या दरात आपली इथे सोय होऊ शकते.
No comments:
Post a Comment