दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!
दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!
सफर गडकोट किल्ल्यांची...
अहमदनगर जिल्ह्यात घनचक्कर रांगेत, प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला हा किल्ला आहे. भंडारदरा धरणामुळे सधन आणि सुपीक झालेला हा प्रदेश आहे. एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे भंडारदर्याचा विस्तीर्ण जलाशय असा हा निसर्गरन्य परिसर आहे.
इतिहास
रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गावं आहे. या रतनवाडीतच अमृतेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे. अमृतेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी आहे. साधारण १२०० वर्षा पूर्वीचे हे मंदिर यादवकालीन स्थापत्यशास्त्राची ओळख करुन देते.पेशवे काळात या मंदिरा संबधी उल्लेख आढळतो तो असा:-
श्री महादेव रतनगडी किल्ल्याखाली आहे, त्यास बालाजी कराळे यांनी किल्ले रतनगड समयी नवस केला, त्याप्रमाणे रतनगड देविले सदरहून सामान श्रीच्या गुरवाजवळ देऊन नित्य नैवेद्य व नंदादीप ताकीद करुन चालविणे म्हणून मोरो महादेव यास सनद दिली.
रतनगडाच्या भौगोलिक स्थानामुळे रागूर व अलंग हे घाटमाथ्यावरचे अन् सोकुलीवाडी हा कोकणातला महाल या गडाच्या अधिपत्याखाली होते.
पहाण्याची ठिकाणे :
रतनगडावर जाण्याअगोदर पायथ्याशी रतनवाडीत असणारे अमृतेश्वराचे मंदिर पाहावे. हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावर प्रचंड प्रमाणात कोरीव काम आढळते. यामध्ये यक्षकिन्नरच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन, मुक्त शिल्पे यांचा समावेश आहे. मंदिराच्या बाजुलाच प्रशस्त अशी पुष्करणी आहे, यालाच विष्णुतीर्थ असे म्हणतात. यात विविध प्रकारच्या मूर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. विष्णु आणि गणपती यांनी शस्त्रे धारण केलेल्या मूर्त्या आहेत. अमृतेश्वराच्या मंदिराशी साधर्म्य साधणारे एक मंदिर नाणेमावळ प्रांतात आढळून येते. किल्ले चावंडजवळील कुकडी नदीच्या उगमापाशी असणारे कुकडेश्वर मंदिर व किल्ले चावंडवरील पुष्करणी हे समकालीन असावेत. शिडीच्या मार्गाने गडावर जातांना प्रवरा नदीचे पात्र आपणा बरोबरच धावत असते. हा रस्ता घनदाट जंगलातून जाणारा आहे. साधारण दुसर्या पठारावर आल्यावर डावीकडे सरळ जाणारी वाट हरिश्चंद्रगडाकडे घेऊन जाते, तर समोरच्या वाटेने शिडी चढून गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो. दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे.दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडची वाट गुहांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट गडाच्या दुसर्या दरवाजाकडे जाते, दुसर्या दरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला भग्नावस्थेतील गोल बुरुज दिसतो, येथेच पाण्याची दोन ते तीन टाके आहेत, येथून थोडे पुढे गेल्यावर वाटेत इमारतीचे अवशेष आढळतात. साधारणत: १० मिनिटे चालल्यावर डावीकडील बाजूस साम्रद गावाकडील कोकण दरवाजा लागतो, दरवाजा उध्वस्त स्थितीत आहे, येथून उतरणारी वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. या वाटेने उतरणे धोकादायक आहे. येथून पुढे गेल्यावर दोन विस्तीर्ण टाके लागतात. काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे. पुढे आणखी थोडे गेल्यावर अनेक टाक्यांची रांगची रांग आढळते. याच मार्गाने पुढे गेल्यावर गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मीत नेढे आढळते. नेढ्यातून चहू बाजुंचा परिसर दिसतो. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा सर्व परिसर दिसतो. डावीकडे खाली चांगल्या स्थितीतील दरवाजा आहे. ३० ते ४० कातळात कोरलेल्या पायर्याही आहेत. संपूर्ण दरवाजा कातळात कोरलेला आहे. दरवाज्यातून खुट्टा सुळक्याचे दर्शन घडते. नेढ्याच्या दुसर्या बाजुने उतरल्यावर अर्ध्या तासावरच प्रवरा नदीचे उगमस्थान आहे. संपूर्ण गड पाहण्यास दोन तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१) रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून :-
एक वाट रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून जाते. या वाटेने गडावर जातांना ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायर्या लागतात. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी २ तास लागतात. वाट सोपी आहे.
२) शिडीची वाट :-
ही वाट गडाच्या डावीकडून जाते. या वाटेने गडावर जातांना दोन शिड्या लागतात. गडावर जाण्यास साधारण २ तास पुरतात, वाट तशी सोपी आहे.
राहाण्याची सोय :
शिडीच्या वाटेने वर चढल्यावर पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजूस तीन गुहा आहेत. यात ७० ते ७५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
शिडीच्या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.
अजिंक्यतारा किल्ला Ajinkyatara Fort – ३०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
अजिंक्यतारा हा किल्ला ‘सातारचा’ किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. सातारा शहरामंध्ये कुठेही उभे राहिले असता नजरेस पडतो. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. येथील किल्ल्यांचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर डोंगर धारेवरून जाण्यासारखी परिस्थिती या भागात नाही. येथील किल्ल्यांचि सरासरी उची कमीच आहे. अजिंक्यताऱ्याची उंची साधारणतः ३०० मीटर असून ती दक्षिणोत्तर ६०० मीटर आहे.
इतिहास : साताराचा किल्ला (अजिंक्यतारा ) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा, साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज (दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला.
इ.स. १६९९ रोजी औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रील १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू मोगलांवर ढासळला व दीडा हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले.
किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा, ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्यांचे नामांतर केले अजिंक्यतारा! पन ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसऱ्या शाहुच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इंग्रजांकडे गेला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावा प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोनदरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्हीबुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाटा दिसते व ‘मंगळादेवी मंदिराकडे’ असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासाळलेला राजवाडा तसेच कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.
मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात कशातही पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जगड हा परिसर दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी दीड तास लागतो.
गडावर जाण्याच्या वाटा : अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस.टी. स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी कोणतीही गाडी पकडावी आणिअदालत वाड्यापाशी उत्रावे. सातारा ते राजवाडा असी बससेवा दर १० -१५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणाऱ्या थेट वाटेने आपण गडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागतो व येथून गाडी रस्त्याने १ कि.मी. चालत गेल्यावर आपण थेट दरवाज्यापाशी पोहचतो. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यास साधारण १ तास लागतो.
१८८८ मध्ये बांधलेले कृष्णाबाई मंदिर महाबळेश्वर मधले प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे.खूप जपल्या मूळ हे मंदिर आजही लोकांना आकर्षित करत.
– एक काळ होता जेंव्हा फोटो काढणे म्हणजे श्रीमंतांचे काम असायचे. खानदानी फोटो काढुन भिंतींवर चढवायचा रिवाजच होता ना तेंव्हा. नंतर मात्र सर्वसामान्य एक चैन म्हणुन महिन्यातुन एकद वेळेस स्टुडीओ मध्ये जाऊन सहकुटुंब फोटो काढुन घेऊ लागले. फिल्म रोल असेपर्यंत तरी फोटो काढणे हे तसे चैनीचेच काम होते. आवश्यक तेंव्हाच, सणा-समारंभाचेच फोटो काढले जायचे. डिजीटल युग अवतरले आणि फोटोग्राफीचा कायापलट झाला. अनेक उदयोन्मुख फोटोग्राफर जन्माला आला. फुलं, झाडं, किडे-मकोडे, निसर्ग इतकंच काय भिकारी, रस्त्यावरील वाहतुक, प्राणी, पक्षी अश्या अनेक चित्र-विचीत्र गोष्टींचे फोटो निघु लागले आणि सौदर्याचे एक वेगळेच दालन सर्वांसाठी उघडले गेले.
डिजीटल एस.एल.आर ने तर क्रांतीच घडवुन आणली. खुद्द डोळ्यांनी सुध्दा जी गोष्ट सुंदर दिसु शकत नाही तितके सौदर्य ह्या कॅमेराने प्रत्येक गोष्टीला बहाल केले. केवळ फोटोग्राफीचा छंद म्हणुन कॅमेरा आणि त्याला लागणारे फिल्टर्स, लेन्स ह्यासाठी लाखो रुपायांवर हसत हसत पाणी सोडणारे कित्तेकजण आजुबाजुला दिसतील. नुसता पैसाच नाही तर त्यासाठी लागणारी चिकाटी, संयम सुध्दा वाखाणण्यासारखा आहे. काही दिवसांपुर्वीच एका वृत्तपत्रामध्ये एका प्रसिध्द छायाचित्रकाराने काढलेला दोन सिहिणींचा फोटो आला होता. हा फोटो मिळवण्यासाठी तो म्हणे २७० तास एका जागी खिळुन होता.
अर्थात ही झाली व्यावसायीक बाजु. परंतु केवळ छंद म्हणुन सुध्दा अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. सिंहगडावर जाणारी नेहमीची वाट सोडुन गडावर नं जाता गडाच्या थोडे खाली जाळीमध्ये, पाणवठ्याच्या ठिकाणी गेलात तर पक्ष्यांची छायाचित्र टिपण्यासाठी तासंतास एका जागी चिकटुन बसलेले अनेक हौशी छायाचित्रकार दृष्टीस पडतील.
#
मुजरा राजं
करवीर छत्रपतींच्या जुन्या राजवाड्यामध्ये छत्रपतींच्या देवघरालगतच एक तख्त ठेवलेले आहे. त्या तख्तावर भगवे वस्त्र अंथरलेले असून त्यावर शिवरायांची तसबीर ठेवलेली आहे. राजवाड्यास भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांच्या मनात हा प्रश्न येतो की, हे तख्त कुणाचे असावे ? तर, हे तख्त खुद्द छत्रपति शिवरायांच्या दैनंदिन वापरातील तख्त आहे. गेली साडेतीनशे वर्षांपासून छत्रपति घराण्याने हे तख्त जपून ठेवलेले आहे.
कोल्हापूरास राजधानी स्थापन झाल्यानंतर छत्रपति शिवाजी महाराज दुसरे यांनी १७८८ साली हे तख्त पन्हाळगडावरुन कोल्हापुरास आणले व आपल्या राजवाड्यामध्ये तख्ताची स्थापना केली. पण अनेकांस असा प्रश्न पडतो की, स्वराज्याची राजधानी सुरुवातीस राजगड व त्यानंतर रायगडावर होती, तर शिवरायांचे तख्त पन्हाळगडावर कसे ? तर, कोल्हापूरच्या राजवाड्यातील शिवरायांचे हे तख्त म्हणजे महाराजांचे 'सिंहासन' नसून, महाराजांच्या दैनंदिन वापरातील 'आसन' होते. शिवकाळात स्वराज्यात असणाऱ्या प्रत्येक गडावर एक तख्त ठेवलेले असायचे. महाराज गडावर आले की फक्त महाराजच या तख्तावर बसायचे. हे तख्तही याच पद्धतीचे असून पन्हाळगडास सिद्दी जौहरचा वेढा पडला असताना महाराज गडावर होते, तेव्हा महाराज याच तख्तावर बसत असत. आपल्या आयुष्यातील सलग सर्वाधिक काळ महाराजांनी पन्हाळगडावर व्यतीत केला, ते याच तख्तावर विराजमान असत, यामुळे महाराजांच्या या तख्तास ऐतिहासिक व भावनिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.
किल्ले पन्हाळगडावर करवीर राज्याची स्थापना केल्यानंतर ताराऊंनी आपले सुपुत्र छत्रपति शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला पण हे तख्त खुद्द थोरल्या महाराजांचे असल्याने तख्ताचा आदर राखण्यासाठी शिवरायांनंतर कोणतेही छत्रपति या तख्तावर बसले नाहीत, उलट छत्रपतींनी या तख्तास मुजरा करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. आजही कोल्हापूरचे छत्रपति शिवरायांच्या या तख्तास मुजरा करतात. पन्हाळगडावरील हे तख्त शिवरायांचेच असल्याने महाराणी ताराराणींसाठी हे तख्त पूजनीय होते. म्हणूनच त्यांनी या तख्ताचा मान राखण्यासाठी विशेष दंडक घालून दिलेला आहे.
काही अभ्यासक अशी शक्यता वर्तवतात, कि छत्रपतींच्या गादीवर शिवरायांनंतर "शिवाजी" या नावाचे एकूण चार छत्रपति झाले, त्यामुळे हे तख्त थोरल्या शिवाजी महाराजांचे नसून नंतरील एखाद्या शिवाजी महाराजांचे असावे. याविषयी थोडासा जरी अभ्यास केला तर असे लक्षात येते की, शिवरायांनंतर गादीवर आलेले "शिवाजी" म्हणजे राजारामपुत्र शिवछत्रपति होय. पण या शिवछत्रपतिंना कैद करुन राजारामपुत्र दुसरे संभाजी गादीवर आले. संभाजीराजेंनी ज्यांना कैद केले, त्यांच्याच तख्ताची ते पूजा अथवा त्यास मुजरा करतील, हे शक्य नाही. त्यामुळे हे तख्त राजारामपुत्र शिवाजी महाराजांचे असावे, हि शक्यता फोल ठरते.
यानंतर संभाजीराजेंच्या पुत्राचे नावही शिवाजीच होते, पण हे तेच शिवाजी महाराज ज्यांनी १७८८ साली हे तख्त पन्हाळगडावरुन कोल्हापूरास आणले व राजवाड्यामध्ये स्थापित केले. ते या तख्तावर बसत नसायचे, त्यामुळे हे तख्त या शिवाजी महाराजांचेही नव्हे. याच शिवाजी महाराजांनी शिवरायांचे तख्त कोल्हापूरास आणले असल्यामुळे यानंतरच्या दोन शिवाजी महाराजांपैकी एकाचे हे तख्त असण्याची शक्यताच उरत नाही.
शिवरायांचे हे तख्त अत्यंत साध्या पद्धतीचे असून लाकडी आहे. कोल्हापूरच्या छत्रपतिंना एखादे तख्त पूजायचेच असते, तर त्यांचेकडे असणाऱ्या सोन्याच्या तख्ताची त्यांनी पूजा केली असती. पण सुवर्णसिंहासनावर बसणारे कोल्हापूरचे छत्रपति लाकडी तख्तास मुजरा करतात, त्यापुढे नतमस्तक होतात, त्याअर्थी हे तख्त साधेसुधे नसून खुद्द शककर्ते शिवछत्रपति महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेले तख्त आहे, हे सिद्ध होते.
तसेच कोल्हापूरचे छत्रपति शहाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स.मा. गर्गे यांनी लिहिलेल्या "करवीर रियासत" या ऐतिहासिक ग्रंथामध्येदेखील हे तख्त शिवरायांचे असल्याबाबतची विशेष नोंद आहे.
कोल्हापूरच्या छत्रपति घराण्यामध्ये अनेक प्रथा परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत. शिवरायांच्या वापरातील अनेक ऐतिहासिक मौल्यवान वस्तू कोल्हापूरच्या छत्रपतींनी जपून ठेवलेल्या आहेत. जुन्या राजवाड्यातील शिवरायांचे तख्तही यांपैकीच एक आहे. शककर्ते शिवछत्रपति महाराजांचे हे तख्त फक्त छत्रपति घराण्यासाठीच नव्हे तर आपणा सर्वांसाठी वंदनीय आहे.
#करवीर_राज्य