! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 21 November 2014

" चांदवड "

चांदवड

महाराष्ट्रात मालेगावच्या जवळ असलेले चांदवड हे एक छोटेसे गाव. पर्वतांनी वेढलेलल्या गावास  धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. चांदवड शहरात फिरायला गेल्यास तिथे आपणास अहिल्याबाई होळकर यांचा रंगमहाल, रेणुका माता मंदिर पहावयास मिळते. तसेच नजीकच्या वडाळीभोई गावाकडे गेल्यास केद्राई माता मंदिर लागते.
रंगमहाल : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हा महाल स्वत:साठी बनवला होता. या महालात वास्तव्यास असतांना  अहिल्याबाई रेणुका मातेच्या दर्शनास जात असत तसेच विंचूरजवळ असलेल्या विहिरीवरही भेट देत असत. तिथे शत्रूंपासून बचावासाठी सुरक्षित जागा केलेली होती.
रेणुका माता मंदिर : ऋषी परशुरामांनी वडिलांच्या आदेशावरुन आई रेणूका मातेचा वध केला. रेणूका मातेचे मुख चांदवड शहरात व धड माहूर गावाजवळ पडले. त्यामुळेच चांदवडला रेणूका मातेचे मंदिर बांधण्यात आले.
केद्राई माता मंदिर :  वडाळीभोई पासून दक्षिणेला ५ किमी खडकओझर गावाच्या शिवारात हे मंदिर आहे.  अपत्य प्राप्तीसाठी अनेक जोडपे केद्राई मातेजवळ नवस करतात. यावेळी नवस फेडण्यासाठी बोकड बळी दिला जातो. प्रत्येक पौर्णिमेला व अमावस्येला या ठिकाणी यात्रा भरते.  या वेळेस हजारो भाविक नवस करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.  मंदिराच्या बाजूलाच केद्राई धरण असून ते पण फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी अतिशय थंड वातावरण असते.
कसे जाल?
नाशिक पासून चांदवड ६४ किमी लांब असून खाजगी वाहनांनी दिड तासात पोहोचता येते. येथे जाण्यासाठी नाशिकहून बस तसेच छोटया गाडयांची सोयही उपलब्ध आहे.

! "" बीजे एक वादळ "" !


" सप्तश्रृंगी देवी वणी "

सप्तश्रृंगी देवी वणी

हिंदू पंचागांप्रमाणे साडेतीन मुहूर्त महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा व अक्षयतृतीया. तसेच महाराष्ट्रातील देवींची पुढील प्रमाणे साडेतीन पवित्र स्थाने प्रसिध्द आहेत. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाभवानी, माहूरची कुलस्वामीनी ही तर भाविकांच्या श्रध्देची स्थाने आहेत. साडेतीननावे पवित्र क्षेत्र सप्तश्रृंग गडाची देवी भगवती, महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून ५५ किलोमीटर्स दूर आहे. नांदूरी गांव सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी आहे. वर जायला ११ किमी. चा रस्ता घाटातून जातो. ज्या गडावर देवीचे देऊळ आहे. त्या गडाला सात शिखरे आहेत. सप्तश्रृंगीगड निवासीनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो. देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर उभा आहे. सप्तश्रृंग गडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत. रामायणातील एका ऋचेनुसार हनुमानाने याच डोंगरावरून जखमी लक्ष्मणाच्या उपचारासाठी एक मुळी नेली होती. वणीच्या गडावर शिवालय तीर्थ, शीतला तीर्थ, व कोटी तीर्थ अशी एकूण १०८ पवित्र कुंडे आहेत.
प्रचंड शीतकडा
तीर्थाच्या पुढे एक प्रचंड दरी शीतकडा म्हणून उभी आहे. ती सुमारे १५०० फूट खोल असावी. एका सवाष्णीने 'मला पूत्र होऊ दे भगवती, मी कडयावरून बैलगाडीत बसून उडी घेईन' असा नवस देवीस केला होता. देवीच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. त्या स्त्रीने आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून शीतकडयावरून खोल दरीत उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजुनही शीतकडयावर पाहता येतात. हा प्रसिध्द शीतकडा समुद्र सपाटीपासून ४६३८ फूट उंच आहे. वणीच्या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७० पाय-या चढून जाव्या लागतात. इ.स. १७१० मध्ये या पाय-या उमाबाई दाभाडे यांनी बांधून घेतल्याची नोंद आहे.
देवीची मूर्ती
सप्तश्रृंगी देवी खानदेशी देवी म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागातून भाविक फार येतात. मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला १८ हात आहेत. ती पाषाण मुर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचीत कललेली मान, आठरा हातात आठरा विविध आयूधे असा देवीचा थाट आहे. ४७० पाय-या चढल्याचे देवीच्या प्रसन्न दर्शनाने सार्थक होते. हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात. दर पौर्णिमेला व नवरात्रात येणा-या भविकांनी गड गजबजून जातो. चैत्री पौर्णिमेला सुमारे एक लाखाच्या वर भाविक गोळा होतात. मोठी यात्रा भरते. जत्रेचा आनंद भक्तगण लुटतात. देवीचा गाभारा ओटीचे खण, नारळ व साडयांनी भरून जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली होती. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या अठरा हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला 'महिषासूरमर्दिनी' असेही म्हणतात.
ध्वज महात्म्य चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता भगवतीच्या देवळावर ध्वज फडकला की भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढया उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे त्यालाही आकलन होत नाही. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहनी उत्तरेकडे फडकत राहतो. स्वामी प्रकाशानंद सरस्वती यांनी धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदि यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ चालू असतो. भगवती नवसास पावते म्हणून भक्तांचा सतत ओघ येथे येतो. विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीया नवस करतात. तसेच इतर पिडा टळावी म्हणून देवीला सांकडे घालतात.
नवीन सुविधा गेल्या पाच वर्षात सप्तश्रृंग गडाचा कायापालट करण्यात आला आहे. पाय-यांवर छप्पर आले आहे तर आजूबाजूला कठडे बांधण्यात आले आहेत. वर जायचा व यायचा रस्ता वेगवेगळा आहे. वर चढतांना दम लागल्यानंतर थांबायला विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आल्या आहेत. धर्मशाळेत उतरण्याची चांगली सोय आहे. गाद्या व ब्लकेटस् पुरविली जातात तर नाममात्र किंमतीत जेवण्याची सोय ट्रस्टने काली आहे. सप्तश्रृंग गडावर एक छोटे नगर वसले गेले आहे. पाण्याची नवी टाकी तयार करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवासासाठी खास विश्रामगृहे बांधली आहेत. देवीची फोटो, पुस्तके, प्रसाद तसेच पुजेचे साहित्य या सर्व गोष्टी लगेच मिळतात. पूजा सांगायला तसेच विविध विधी करायला पुरोहीत वृंद हजर असतो. घरगुती जेवणही गुरुजींकडे मिळू शकते. एकूण काय भक्त मंडळी प्रसन्न होऊनच परत जातात.

! "" बीजे एक वादळ "" !

" तुळजाभवानी "

तुळजाभवानी देवी - तुळजापूर

tuljabhavaniभारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.
स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे.
देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.
तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होते. तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. नवरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते. या विधीस मोठे महत्त्व आहे. तसेच नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री भवानी मातेचा जागर होतो. प्रशाळपूजेनंतर देवीला विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटस्थापन करण्यात येते. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
तुळजापूरस्थित भवानी मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. भवानी मातेचे मंदिर खोलगट भागात आहे. मंदिराकडे जाण्यासाठी उताराचा रस्ता आहे. या मंदिरात प्रवेश करताच डाव्या हाताला तीर्थकुंडे आहेत. एकशे आठ झ-यांचे उगमस्थान असणारी ही तीर्थकुंडं कल्लोळतीर्थ व अमृतकुंड या नावांनी ओळखली जातात. मंदिराच्या उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. भाविक मंदिरात प्रवेश केल्यावर या सर्व देवतांचे दर्शन घेत दत्तपादुकांजवळ येऊन पोहोचतात. गाभा-याजवळील गणेश मूर्तीचे दर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर गाभा-या समोरील पाच पाय-या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती पध्दतीचे आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.

! "" बीजे एक वादळ "" !


" भीमाशंकर मंदिर "

भीमाशंकर मंदिर, ता. खेड, जि. पूणे

tuljabhavani भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. या ज्योतिलिंर्गामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.
हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभा-यातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
गुप्त भीमाशंकर - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिलिंर्गात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूवेर्ला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
कोकण कडा - भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.
सीतारामबाबा आश्रम - कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते

नागफणी - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.

! "" बीजे एक वादळ "" !

" भंडारदरा धबधबा "

डारदरा हे नाशिकपासून ७० कि.मी. वर असणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. भंडारद-याचे खरे सौंदर्य हे पावसाळयानंतर अधिक खुलते, नाहीतर इतर वेळेला हा भाग अगदी रखरखीत असतो. १९२६ साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे. इथला 'छत्री' (umbrella) धबधबा हा अतिशय सुंदर व मनोहर आहे. भंडारद-यापासून ११ कि.मी. वर रंधा धबधबा आहे. हा धबधबा ४५ मीटर उंचीवरून खाली कोसळतो. त्यामुळे हे दृश्य सुंदर असून सुध्दा भीतीदायक वाटते. हा धबधबा पाहण्याकरिता पर्यटकांसाठी सुरक्षित सोय केली आहे. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांना भंडारद-यापासून कळसूबाई शिखर खूपच जवळ आहे. महाराष्ट्रातले उंच असणारे हे शिखर समुद्रसपाटी पासून १,६४६ मीटर उंच आहे. हा भाग दाट जंगल-झाडींनी वेढलेला आहे. विविध प्रकारचे वन्य प्राणी व पक्षी येथे सहजपणे आढळतात. रस्ता घनदाट जंगलातून जात असल्यामुळे गिर्यारोहकांनी स्थानिक वाटाडयांची अथवा पुस्तकांची मदत घेतलेली अधिक चांगली. जवळ अमृतेश्वर देऊळ आहे. येथे शंकराची पुरातन पिंड आहे. अमृतेश्वरला बोटीने जावे लागते. येथूनच पुढे रतनगड किल्ला आहे. हा किल्ला फारसा वैशिष्टयपूर्ण नसला तरी पर्यटकांसाठी भेट देण्याजोगा आहे. भंडारदऱ्यापासून २२ कि.मी. असणारे 'घाटघर' ठिकाण थरारक ड्रायव्हींगची आवड असणा-यासाठी योग्य आहे. पावसाळयात ह्या भागात संपूर्णत: धुके असते. तसेच घाटघर कडे जाणारा रस्ता खाचखळग्यातून जाणारा निमूळता रस्ता आहे. त्यामुळे चालक रस्ता चुकण्याची शक्यता अधिक आहे. भंडारदरा येथे महाराष्ट्र पर्यटक मंडळाने राहण्याची व जेवण्याची उत्कृष्ट सोय केली आहे. मंडळाची रहाण्याची सोय तळयाकाठी असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. राहण्याची सोय दूरध्वनी (६२८१६९, ६२६८६७) वरून होऊ शकते. आता काही खाजगी हॉटेल्सची सोय सुध्दा उपलब्ध आहे. भंडारदारा येथे तुम्हाला उच्चप्रतीची राहण्याखाण्याची सोय कदाचित मिळणार नाही पण निसर्गाचा आनंद मात्र मनमुराद लुटता येईल.


"" बीजे एक वादळ "" !

" बारा ज्योतिर्लिंगे "


सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम्
उज्जयिन्याम् महाकालम् मोंकालममलेश्वरम् |
परल्यां वैजनाथं च डाकिंन्यां भीमशंकरम्
सेतुबंधे तु रामेशं, नागेशं दारुकावने |
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे
हिमालये तु केदारम् घृशुणेशं शिवालये
एतानि द्वादश ज्योतिर्लिंगानी सायंप्रात: पठेन्नर:
सप्तजन्मकृतपापं स्मरणेन विनश्यति | ||

१) सोमनाथ - सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.
२) मल्लिकार्जुन - गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍िरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
३) महाकाळेश्वर - उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.
४) अमलेश्वर - ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.
५) वैद्यनाथ - शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
६) भीमाशंकर - भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.
७) रामेश्वर - दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.
८) नागेश्वर - श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
९) काशीविश्वेश्वर - वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.
१०) केदारेश्वर - हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
११) घृष्णेश्वर - (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.
१२) त्र्यंबकेश्वर - नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।

॥शाहू राजवाडा ॥

नवा राजवाडा (शाहू म्यूझियम) : दसरा चौकातून शहराच्या उत्तरेकडील भागात तीन कि. मी. अंतरावर नवा राजवाडा मोठ्या डौलाने उभा आहे. या राजवाड्याचा नकाशा मेजर मँट या वास्तुशिल्पकाराने बनविला आहे. आणि तो तयार होण्यास सन १८७७ ते १८८४ असा सात वर्षाचा कालावधी लागला. त्याकाळी त्याची किंमत सुमारे सात लाख रुपये होती. याची दर्शनीय बाजू दक्षिणेला असून राजवाड्याच्या मध्यभागी असलेल्या उंच मनोऱ्यावर एक भलं मोठं घड्याळ चारही दिशेने वाढत असलेल्या करवीर नगरीची शान पाहत आहे. या मनोऱ्याची उंची १३५ फूट आहे. राजवाड्याच्या एका बाजूला दरबारगृह व बिलिअर्ड खेळण्याची खोली असून दूसऱ्या बाजूला दोन मोठ्या खोल्या स्वागत प्रतिक्षेसाठी आहेत. मागील बाजूस मोठा खुला चौक असून त्याच्या मध्यभागी एक कारंजा आहे. मुख्य राजवाडा दुमजली असून त्याच्यावर लहान मोठे मनोरे व घुमट आहेत. मिश्र शिल्पकलेचा हा एक उत्कृष्ट व तितकाच सुंदर नमुना आहे. हा राजवाडा, त्या समोरील छोटा तलाव, तलावाकाठी छोटे राखीव जंगल आणि त्यातून हिंडणारी हरणे व इतर प्राणी, वाड्याभोवतालचा रम्य परिसर मनाला मोहविणारा आहे.श्रीमंत छत्रपतींचे हे निवासस्थान. राजवाड्याच्या काही भागात सध्या शाहू महाराजांच्या काळच्या ऐतिहासिक वस्तू व शिल्प यांचे संग्रहालय करून स्मारक म्हणून राखून ठेवले आहे. छत्रपती शाहूंची मौल्यवान छायाचित्रे व पेंटिग्ज, त्यांनी शिकारीसाठी व लढाईमध्ये वापरलेल्या बंदुका व अन्य शस्त्रे, शिकारीत मिळालेली जनावरे आकर्षक पध्दतीने मांडलेली आहेत. या राजवाड्यातील भव्य दरबार हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने चितारलेले आहेत. पूर्वी दरबार भरत असताना ज्या पध्दतीने सजवला जात असे त्याच पध्दतीने सजवून तो प्रेक्षकांपुढे मांडलेला आहे, हे दरबार हॉलचे वैशिष्ट्य. राजवाड्याचा परिसरही उद्याने व हिरवळीने नटलेला आहे. हे म्युझिअम सोमवारी बंद असते. इतर दिवशी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत खुले असते.जुना राजवाडा (भवानी मंडप) :शहराच्या मध्यवस्तीत व महालक्ष्मी देवालयाच्या सान्निध्यात असलेला हा राजवाडा सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधला गेला. त्यानंतर अनेकवेळा त्यात सुधारणा केल्या गेल्या. सन १८१३ मध्ये त्याचा काही भाग पुन्हा बांधण्यात आला. राजवाड्याचा पुढील भाग तर संपूर्णपणे बऱ्याच कालातंराने बांधला गेला आहे. हा राजवाडा दुमजली असून मध्यभागी मोठा हॉल आहे. येथे श्री. महालक्ष्मी (तुळजा भवानी) च्या प्रतिमेची स्थापना केली आहे. या हॉलचा उपयोग दरबारगृह व खाजगी धार्मिक विधीकरता होत असे. राजवाड्याखेरीज इतर विस्तारित भागांचा उपयोग संस्थान काळात निरनिराळया संस्थानी कार्यालयासाठी म्हणून होत असे. सध्या या विस्तारित इमारती पोलिस स्टेशन, कोर्ट, एन. सी. सी. ऑफिस, शेतकरी बझार, राजाराम हायस्कूल, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल वगैरे करिता वापरल्या जातात. राजवाड्यासमोर एक मोठा मंडप असून त्याला भवानी मंडप असे म्हणतात. भवानी मंडप हे सध्या सिटी बसेसचे एक केंद्र आहे. या राजवाड्याच्या उत्तरेला जुन्या पध्दतीची पाच मजली वास्तू आहे. याचा वापर नगारखान्याच्या वास्तूला तीन मोठ्या कमानी आहेत. मधल्या हॉलमध्ये जो पूर्वी दरबारी थाट होता तो अलिकडच्या काही वर्षात पहावयास मिळत नाही व इथून पुढे मिळणारही नाही. सध्या तेथे एक गवा रेडा आणि वाघ, सांबर आदि कांही प्राणी भुसा करुन उभे केलेले आहेत. रान- रेडा सध्याच्या छत्रपतींनी सुमारे ३० - ३५ वर्षापूर्वी मारला होता. ही एकच काय ती निशाणी राहिलेली आहे. बाकीचा सर्व वैभवी थाट लोप पावलेला आहे. शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान :कोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिध्द आहे. श्री. शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे. या खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या, असंख्य पैलवान या मातीत नावारुपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळयांचे पारणे फेडले. हे मैदान मंगळवार पेठेत असून जुन्या राजवाड्यापासून चालत पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मैदान अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून अशा प्रकारचे मैदान क्वचितच असेल. याचा आकार पूर्ण गोलाकृती असून मध्यभागी कुस्ती खेळण्याचा मोठा आखाडा आहे. या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कुस्त्या केल्या जातात. सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी म्हणून उतरण आहे. या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट तबकासारखा दिसतो. पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशाची सोय आहे. पूर्वेला निमंत्रित व मान्यवर व्यक्तींना बसणेकरिता मोठा मंच असून त्यावर मंडप उभारलेला आहे. या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा इतर कार्यक्रमासाठीही केला जातो. आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक अंतराच्या आत येऊ नये म्हणून दोन वर्तुळकार लोखंडी कठडे तयार केलेले आहेत. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असून त्यालगतच केशवराव भोसले नाट्यगृह आहे.केशवराव भोसले नाट्यगृह :सध्या कोल्हापुरात असलेले हे नाट्यगृह सुमारे ९० वर्षापासून उभे आहे. महाराष्ट्रातील हे सर्वात जुने नाट्यगृह होय. या नाट्यगृहाची उभारणी राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रेरणेने झाली. पूर्वी यास पॅलेस थिएटर या नावाने ओळखत असत. याच्या बांधकामास ९-१०-१९१३ रोजी सुरवात झाली. १४-१०-१९१५ रोजी याचे बांधकाम पूर्ण झाले. नाट्यगृहाचे रंगमंच भव्य चौकोनासारखे असून ते ७२० फूट आकाराचे आहे. रंगमंचाखाली १० फूट खड्डा असून त्यात पाणी आहे. पूर्वी ही विहीर होती असे म्हणतात. रंगमंचाखाली पाणी ठेवण्याचा उद्देश आवाज घुमावा हा आहे. हे या नाट्यगृहाचे एक खास वैशिष्ट्य आहे. पाणी खेळविण्यासाठी पक्की गटारे बांधली आहेत. रंगमंचाच्या पूर्वेकडील बाजूस दोन रंगपटगृहे आहेत. भक्कम फळया घालून रंगमंच बांधले आहे. नाट्यगृहात कोठेही खांब नाहीत त्याकाळी बांधलेल्या बहुतेक नाट्यगृहात खांब फार असत व त्यामुळे काही प्रेक्षकांना रंगमंचावरील पूर्ण भाग पाहता येत नसे. कलाकार, प्रेक्षक व आवाजाचा अंदाज घेऊन हे नाट्यगृह बांधले असल्यामुळे कोठूनही पूर्ण रंगमंच दिसतो व संभाषण चांगले ऐकू येते. पीटाच्या पहिल्या रांगेतील प्रेक्षक व रंगमंच यामध्ये सुमारे ८० फूट अंतर आहे. माडी प्रशस्त व खानदानी वाटते. बसण्याची जागा चांगली रुंद आहे. पूर्वी माडीवर दोन्ही बाजूस राज घराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी दोन चष्मे (बंदिस्त खोल्या) ठेवण्यात आले होते. गोषातील स्त्रिया येथून नाटके पाहत. अलिकडे नाट्यगृहात अंतर्बाह्य खूपच सुधारणा झाल्या आहेत.नाट्यगृहाच्या सभोवताली प्रशस्त मोकळी जागा असलेने त्यांच्या सौंदर्यात भर पडली आहे. या आवारात कोल्हापूरचे सुप्रसिध्द अभिनेते कै. अरुण सरनाईक यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. एका कारंज्याचीही रचना केलेली होती, पण हे कारंजे सद्यस्थितीत बंद आहे. नाट्यगृह रस्त्यापासून थोडे बाजूला व रस्त्याच्या पातळीपासून खाली असल्याने बाहेरच्या गलबलाटाचा नाटकावर परिणाम होत नाही. एकंदरीत नाट्यगृहाची रचना व सोयी या दृष्टीने ज्या काळात नाट्यगृह बांधले त्याचा विचार केला तर तर अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही.हे नाट्यगृह बांधण्यापूर्वी कोल्हापुरात लक्ष्मी प्रसाद, शिवाजी व श्री. मेंढे यांचे शनिवार थिएटर अशी तीन नाट्यगृहे चालू होती. राजश्री शाहू छ. महाराज हे कलांचे रसिक भोक्ते व उदार आश्रयदाते होते. कोल्हापुरात नव्हे तर महाराष्ट्रात नाट्य व संगीत कला यांच्या वाढीस शाहू महाराजांचे सहाय्य कारणीभूत झाले. १९०२ मध्ये शाहू महाराज विलायतीला गेले. तिकडील विशेषत: रोममधील कुस्त्यांची मैदाने व पॅलेस थिएटर यांच्या रुपाने प्रगट झाले. पॅलेस थिएटरचे उद्घाटन त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांचे हस्ते झाले. थिएटरचे अनावरण १९१५ साली दसऱ्यास किर्लोस्कर संगीत नाटक मंडळींच्या मानापमान या नाटकाचा प्रयोग होऊन झाले. किर्लोस्कर नाटक कंपनीबरोबर राम गणेश गडकरीही आले होते.स्वातंत्र्यानंतर या नाट्यगृहाचे पूर्वीचे नाव पॅलेस थिएटर बदलून केशवराव भोसले नाट्यगृह असे ठेवण्यात आले. कोल्हापूरच्या केशवराव भोसले या नामवंत नटाचे नाव या नाट्यगृहास देऊन त्यांचा गौरव केला गेला. त्यांची दोन तैलचित्रे रंगमंचावर लावण्यात आली आहेत.