! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 26 September 2014

! " स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगढ " !





राजगड

                                       

१) राजगड

हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! शिवतिर्थ रायगड! हिंदवी स्वराज्याची राजधानी गडांचा राजा, राजियांचा गड राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन् भोरच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खो-यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.

                                                             इतिहास

इतिहासातून अस्पष्ट येणा-या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर आहे. ब्रम्हर्षी ऋषींचेयेथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा.राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव हा किल्ला बहमनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरुमदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडीलरुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते.मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरी बद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला. शिवरायांनी मुरुमदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखीत पुरावा आज मात्र उपलब्ध नाही त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे.शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, 'शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.' सभासद बखर म्हणतो की, 'मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे.' मात्र सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाटाने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले.इसवीसन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्या मुळे मुगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे'सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.' शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले.सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारले यानंतर मुगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र आप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने 'कानद खो-यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ' असा आदेश दिला होता.पुढे ११नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून ावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड'असे ठेवले.२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली.पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते - राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

                                                         सुवेळा माची

पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडं वर आलं की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे , एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.

                                                 पद्मावती तलाव

गुप्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. रामेश्र्वराचे मंदिरःपद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतिरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

                                                                  राजवाडा

रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर जातांना उजवीकडे राजवाडाचे काही अवशेष दिसतात.या राजवाडामध्ये एक तलाव आहे.या शिवाय राजवाडापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो.याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे. सदरःही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू. रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाडाचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे.अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. पाली दरवाजाःपाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पाय-या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेश द्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

                                                          संजीवनी माची:-

सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पाय-यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात.दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. आळु दरवाजा संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सस्थितीला ब-यापैकी ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे चित्र या शिल्पात दाखवले आहे. सुवेळा माचीःमुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणा-या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे.येथे असणारे चौथरे येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुस-या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुस-या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुस-या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेट किंवा 'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात.हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.

                                                                 बालेकिल्ला

राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे.ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे.या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाडांचे अवशेष आढळतात. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.

गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.१.गुप्तदरवाज्याने राजगड : पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत.यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.२.पाली दरवाज्याने राजगडः पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा.ही वाट पाय-याची असून सर्वात सोपी आहे.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते.ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात.माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये.४.अळु दरवाज्याने राजगडः भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.५.गुप्तदरवाजामार्गे सुवेळामाची: गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.राहण्याची सोय:१. गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.२. पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.जेवणाची सोय: आपण स्वतः करावी.पाण्याची सोय: पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास

! " ६ वर्ष अजिंक्य राहिलेला रामशेज किल्ला " !



अजिंक्य रामशेज किल्ला

६ वर्ष अजिंक्य राहिलेला रामशेज किल्ला

नाशिक जवळ दिंडोरी पासून १० मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे  किल्ले  घनदाट  जंगलात  आहेत, डोंगर  दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या  मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दऱ्यादेखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. हि सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.शहाबुद्दीन खान ह्याच किल्ल्यावर चांदसितारा  फडकवावा आणि त्या नंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. शहाबुद्दीन किल्ला घेण्यासाठी चालून आला. त्याच्या सोबत १० हजाराची फौज होती आणि अफाट दारुगोळा आणि तोफा होत्या. त्यामुळेच औरंगजेबाच्या सरदाराला वाटले कि हा किल्ला आपण ताबडतोब काबीज करू. त्याने औरंग्याला सांगितले होते कि, मी एक  दिवसात किल्ला घेतो म्हणून.किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते. किल्ल्यावर सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदार होते. हे मुळचे मावळातले. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. सूर्याजी जेधे रामशेज च्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. लाकडाच्या तोफांना जनारावरांचे कातडे लावून तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगारून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.    मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि लाकडी बुरुंज बनवला (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात) तोही इतका उंच कि किल्ल्याच्या उंचीचा. हा लाकडी बुरुंज कशासाठी ? तोफा या लाकडी बुरुंजावर नेवून ठेवायच्या आणि मग तिथून किल्ल्यावर तोफा डागायच्या. ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा बुरुंज बनवला. या लाकडी बुरुंजावरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठे सुद्धा या लाकडी बुरुंजावर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे सारायला तयार नव्हते. शहाबुद्दीन च्या हाती यश येत नव्हते.२ वर्षे झाली, इतके करूनही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला.    फतेह खानमग मात्र औरंग्या ने शहाबुद्दीन ला परत बोलावून घेतले. त्याने रामशेज ची हि मोहीम सोपविली फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर. आणि मग फतेह खान २० हजारीची फौज घेवून आला. आणि त्याने रामशेज वर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार  व्हायचे. त्या फतेह खानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. फतेह खानच्या सैन्याला सळो कि पळो करून सोडले या मरहट्ट्यान्नी. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेह खान हाती फक्त निराशा अपमान आणि माघारच आली.फतेह खानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सारून सकाळ झाली कि ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुंज परत बांधून झालेला असायचा. ते  दृश्य पाहून फतेह खान  आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. परंतु फतेह खानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले कि या मरहट्ट्यानां जादूटोना येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची.    अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खुपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेह खानच्या एका सरदाराने फतेह खानाला सांगितले कि युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेह खान ला हे पटले नाही, पण किल्ल्या जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदारा कडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेह खान ला म्हणाला, “हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टे क्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नाग दे दिजीये बाकी मी संभाल लेता हु”  मग त्या मांत्रिकाने मागितल्या प्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्या जवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेह खानाचे  सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्या वरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या अंगावर आला. त्याचा तडाखा इतका जोरदार होता कि नाग एकीकडे आणि मांत्रिक दुसरीकडे जावून पडला. फतेह खान चे सैन्य पाठीला पाय लावून छावणीच्या दिशेने जोरात पळत सुटले.फतेह खानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरु केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येवून फतेह खानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेह खान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता. किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेह खानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, “उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाब हो जोगे तो तुम्हारा नाम होगा” वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेह खान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेवून झाडा झुडपाच्या सहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जावू लागले.एकंदरीत फतेह खानाचा बेत असा होता कि, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्या मध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. आणि मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेह खानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार सूर्याजी जेधे पुढच्या बाजूला मुख्य बुरुंजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेह खानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेह खानाने रात्रीचा मारा सुरु केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतय. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेह खान चा डाव समाजाला, तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुंजावर दबा धरून मोगल सैनिकाच्यावर पळत ठेवून बसले.वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला कि तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्यू तांडवा मुले सगळे मोगल सैनिक जीवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होवून मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेह खान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू) पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देवू लागले, “हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!”     कासम खानऔरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावून घेतले. आणि कासम खान ला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेवून रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रुपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेवून तयार होते. पण कासम खानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते.  हि परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासम खानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस साडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येवू लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होवू लागले. मग कासम खानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रहि सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासम खानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्या लक्षात आले कि, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्याच्या जीवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळे हि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधी मूळे त्याने पहारे दिले केले होते, त्याच्याच फायदा घेवून दाबा धरून बसलेली रुपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासम खानाला कळून चुकले कि रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे. दिवसा किल्ल्यावरून मरहट्टे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते.कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही. हा किल्ला ६ वर्ष झुंजत होता.

● संताजी घोरपडे



संताजी घोरपडे



महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले तीच परंपरा पुढे शंभुराजांच्या कालात हंबिराव मोहिते यांनी चालू ठेवली. शंभुराजांना आणि कवी कलाशंना संगमेश्वरी शेख निजाम यानि पकडले आणि त्याच वेळेस म्हालोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोघलांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि शंभु राजांच्या तल्मित तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्तावलेल्या मोघल बादशाहला गाढ़ला. या योध्यात एक आघाडिचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे". मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होउच शकत नाही.चोलराजा हा घोरपडे घराण्याचा वंशज. चोलाराजचा मोठा मुलगा पिलाजी घोरपडे (बजी घोरपडे यांचे आजोबा) हा मुधोल ची जहागीर संभालून होता तर त्याचा दूसरा पुत्र वल्लभजी यांस वाई प्रांतातल्या पाटिलक्या देण्यात आल्या होत्या. याच वल्लभजीचा नातू म्हणजे "म्हालोजी घोरपडे" ज्यांना संगमेश्वरी वीर मरण प्राप्त झाले. आणि याच वल्लभजीचा पणतू म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, ज्यांनी स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावली. (sources- डॉ.जयसिंह पवार)म्हालोजी घोरपडे हे शिवाजी महाराजांस आपल्या ५०० स्वरानिशी येउन मिळाले. म्हालोजी हे पुढे पन्हालगडाचे तटसरनौबत होते. शंभुराजे जेव्हा दिलेर खानाकडून निघून आले तेव्हा त्यांची व्यवस्था पान्हाळ्यावर केलि होती आणि सोबतीस म्हालोजी घोरपडे दिले होते. असे कापशीकर घोरपडे घराण्याचा इतिहास सांगतो. संपूर्ण शंभु राजांच्या कारकिर्दीत म्हालोजी घोरपडे हे स्वराज्य राखण्याचे चोख काम करीत होते. शिरक्यांचे बंड मोडून काढण्याच्या वेळी स्वतः शंभु राजांच्या सोबत म्हालोजी घोरपडे हजर होते. मोगल सरदार मुकर्रब खान जेव्हा संगमेश्वर येथे शंभु राजांस कैद करण्यास पोचला तेव्हा म्हालोजी घोरपडे यांनी लढाई केलि पण ते मारले गेले.संताजी घोरपडे यांचे जन्म साल इतिहासाला माहित नाही पण जयसिंह पवारांच्या अंदाजानुसार साधारण १६४५ असू शकते. चिटणीस बखर सांगते की हंबिररावनच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते. अहमदाबाद, बुराण्पुर, जाल्नापुर, सिंदखेड हे मुलुख लुटत हंबिरराव स्वराज्यात आले. हंबिररावनच्या विनंतीवरुन संताजिंस जुमलेदारी दिल्ही. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोप्पल प्रांत जिंकणे ही एक महत्वाची योजना होती. कोपल हे अदिल्शाहिचे सरदार हुसैनखान आणि कासिम खान यांचे ठाणे होते. या मोहिमेत हंबिरराव यांनी या पठाण बंधूंचा पड़ाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले. ९१ कलमी बखर सांगते की या युद्धात संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांनी मोठे रण माजवले. पण जालन्याच्या स्वारित संताजिच्या हातुन काही तरी चुक झाली म्हणुनच महाराजांनी त्यास मुजर्यास न येण्याची शिक्षा ठोठावली असे ९१ कलमी बखर सांगते. जालनाची मोहिम ही महाराजांच्या जिवनातील शेवटची मोहिम, जालना शहर मराठयानी ४ दिवस लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि बरीच लूट परत घेउन गेला, या यूद्घात सिधोजी निंबाळकर कामी आले.शंभु राजांच्या मृत्यु नंतर मोघलंनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला, जुल्फिकार खान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले. याच दरम्यान संताजी खर्या अर्थाने एक नेता म्हणुन उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजी बरोबर सुखरूप विळख्यातुन बाहेर काढले. राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा, पन्हाला करत बेदनुरच्या राणीच्या साह्याने जिंजिंस सुखरूप निघून गेले. येथे महाराष्ट्रात, शंभुराजांच्या मृत्यु आणि मराठ्यांचे राज्य संपणार या धुंधित मोघल गाफिल झाले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा संताजिने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूवरील कळस कापून नेले. संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने अवघ्या २००० सैन्यानिशी तुलापुर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानीकरुन सिंहगडावर पसार झाले. (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) नंतर संताजिंनी जुल्फिकार खानावर हल्ला केला. जुल्फिकार त्या वेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता. या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली, ती घेउन ते थेट पन्हाल्यास असलेल्या राजाराम राजांस भेटले.(संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)साधारण १६८९ (नोव्हे- डिसे) या कालात शेख निजाम कोल्हापुरास होता. ह्यास संताजिने युद्धात हरवले, मुकर्रब खान याच युद्धात जबर जख्मी झाला (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) . पुढे त्याचा (मुकर्रब खान) कुठे उलेख सापडत नाही बहूदा तो नंतर या जख्मानमुले मेला सुद्धा असेल.पुढे हाच स्वातंत्र लढा संताजी-धनाजीने बेलगाव-धारवाड़ करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकड़े आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शेहजादा काम्बक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोड़दल घेउन तर धनाजी साधारण १० हजाराचे घोड़दल घेउन जिंजिंस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेउन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागुन येणार्या संताजिंस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजिंच्या मोगली फौजेला रसद पुरवित असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गवरनर मार्टिन याने आपल्या डायरित नोंद केलि आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशा समोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहात झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातुन मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावनित आला. जुल्फिकार खानने राजारामकड़े वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुक्माची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वतंत्रयुद्ध)जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजी आणी राजाराम राजात वाद निर्माण झाला. वास्तविक संताजी हे एक खरे सेनानी होते त्यांना राजकारणाची तितकीशी जाण असण्याची शक्यता कमी होती. या उलट राजाराम राजांस अनेक राजकारणी मंडली सल्ले देत होती.संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासिमखान जिंजी कड़े चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासिम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरम नजिक कावेरिपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणी खान कांचीपुरमला पलुन गेला, तिथे त्याने देवलांचा आश्रय घेतला आणी धोका मिटे पर्यंत तिथेच लपून बसला.याच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केलि आणी याचप्पा नायका संगे मोगलान विरोधात लढु लागले.राजारामने संताजिंस सुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवान कड़े देण्यात आले होते. येथे एक लक्ष्यात घेण्या सारखी गोष्ट म्हणजे, सेनापतिपद गेले तरी संताजीने मोग्लान विरोधातला लढा चालूच ठेवला. ते मोग्लाना वतना साठी किंवा कुठच्या पदासाठी जाउन मिळाले नाहीत. हाच खरा मराठ्यांचा स्वातंत्र लढा जो १८५७ च्या क्रांति पेक्षा ही किती तरी पटीने सरस होता.जाने १६९५ दरम्यान संताजी ने कर्नाटकातुन मुसंडी मारली ती थेट बुरहानपुरात. मोगली सुबेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयन्त केला पण मराठ्यांच्या २०००० सैन्या पुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बुरहानपुर सोडून पलुन गेला. मराठयानी बुरहानपुर लूटले आणि ही बातमी जेव्हा औरन्ग्यास कळली तेव्हा त्याने बुरहानपुरच्या सुबेदारास बांगड्यानचा आहेर पाठवला.नंतर संताजीने सुरत लूटण्याचा बेत आखला होता पण तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजी बरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसले नाहीत आणि ते परत खटाव प्रांतात आले. तिथे त्यांने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पलुन गेले, अनेक सरदार कैद झाले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डरी ची लढाई आणि दूसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खाना बरोबर अनेक नामवंत सरदार त्यांच्या मागे पाठवले होते. कासिम खान बरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि काम्बक्षचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचाली वर लक्ष ठेउन होते. त्यांना आपल्या गुप्तहेरा कडून बित्तंबातमी मिळत होती. कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजिने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्या प्रमाणे आपल्या सैन्याच्या ३ तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतावण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानाजाद खाना बरोबर तिथे पाठवून दिले. संताजिच्या दुसर्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरु केली. आता कासिम खानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसर्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पूरी वाताहात करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोडेरीच्या गढ़ीचा आश्रय घेतला. संताजीने या गढ़ीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकले सोडले. कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लाउन एक रात्री किल्ल्यात निघून गेले, फौजेला संताजीच्या तोंडी देऊन. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद सुद्धा संपत आली. खानाचे सैन्यतर उपाशी मरू लागले. शेवटी मोग्लंनी संताजीकड़े जीवदानाची याचना केली. संताजीने मोग्लांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होउन कासिम खानाने विष पिउन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढाईचे साधे वृत सुद्धा दिले नाही.(संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)संताजी घोरपडे यांच्या आयुशातला दूसरा मोठा विजय म्हणजे बसवापट्टणची लढाई. या युद्धात संताजिने हिम्मत खान बहादुर याचा पूर्ण बीमोड केला. दोद्देरीच्या युद्धात मराठयानी कासिम खानचे कंबरडेच मोडले होते. वास्तविक कासिम खानच्या मद्तींस औरंगजेबाने हिम्मत खानास पाठवले होते. बसवापट्टणच्या जवळ हिम्मत खानाने आपला तळ टाकला होता, तो संताजीवर चालून जाण्यास कुचरत होता. एके दिवशी संताजी अगदी अल्प फौजेनिशि हिम्मत खानवर चालून गेले. हिम्मत खानास जेव्हा हे कळले तेव्हा तो सुद्धा युद्धास तयार झाला. मोगल सैन्य संताजिंवर तुटून पडले, युद्धास तोंड फुटले. मराठे युद्धात पडू लागले आणि संताजिने माघारिचे कर्ण फूंकले. आता मोग्लांस चेव चडला आणि पळणार्या मराठ्यांचा त्यांनी पाठलाग सुरु केला. संताजी बसवापट्टणच्या गडी बाहेरच्या जंगलात घुसले. त्यांच्या मागोमाग मोगल सुद्धा तिथे घुसले. जंगलात आधीच लपून बसलेल्या मराठ्यांच्या बंदुकधार्यंनी एक एक करुन मोग्लंना टिपले. युद्धाचे पूर्ण चित्रच पालटले, जे मोगल सैन्य वरचढ़ झाले होते तेच आता पाठ दाखवून पलू लागले. पण त्यांच्या परतीचा मार्ग बंद केला होता. आता हिम्मत खान सुद्धा शर्थीने लढु लागला पण बंदुकीचा एक गोला त्याच्या डोक्यास लागला आणि तो बेशुद्ध झाला. हिम्मत खानाचा मुलगा सुद्धा या युद्धात जख्मी झाला. बाप लेकास मोगल सैनिक परत कसेबसे घेउन गेले. त्या रात्री हिम्मत खान मरण पावला. खानाच्या लष्करातील अनेक घोडे, हत्ती, तोफा, शास्त्रे संताजिच्या हाती लागले. या लढ़ाईचा खाफिखान दाखला देतो. या लढ़ाई नंतर संताजी, जिंजिंस राजाराम राजांस भेटण्यासाठी निघून गेले.संताजी जिंजी कड़े येत असताना, वाटेत अर्काट नजिक त्यांचा मुकाबला जुल्फिकार खानाशी झाला. या युद्धात संताजिचा पाडाव झाला आणि ते पलुन गेले असे भीमसेन सक्सेना लिहितो. ते थेट गेले ते जिंजित, तिथे त्यांनी मद्रास आसपास मोहिम करण्याचे मनसूबे रचले असे कही इंग्लिश पत्रे लिहितात. पण याच दरम्यान त्यांचे आणि राजाराम राजांचे काही तरी बिनसले. नक्की काय झाले याचे दाखले कोणीच देत नाहीत. पण राजारामशी वितुष्ट येताच संताजी आपल्या २० हजार फौजेसह जिंजी बाहेर पडले. संताजिचा बीमोड करण्यासाठी खुद्द राजाराम राजे सोबतीला धनाजी जाधव, अमृतराव निमंबालकर असे वीर घेउन जिंजी बाहेर पडले. संताजिना त्यांनी आयेवरकुट्टी यथे गाठले, या दोघात मोठे युद्ध झाले आणि शेवटी राजारामचा पराजय झाला. धनाजी पलुन जाण्यात यशस्वी झाले तर अमृतराव निमंबालकर या युद्धात मारले गेले. खुद्द राजराम राजांस संताजिने कैद केले पण नंतर सन्मानाने मुक्त सुद्धा केले.जरी छत्रपतिशी वितुष्ट आले होते तरी सुद्धा संताजिने मोग्लंशी संगर्ष चालूच ठेवला. मराठ्यांच्या यदाविच्या बातम्या जुल्फिकार खानास कळल्या आणि त्याने आपली फौज अर्काट बाहेर काडली पण संताजी पुन्हा अर्काट दिशेनी येत असल्याची बातमी कळताच खान परत निघून गेला. पुढे संताजी कृष्णपट्टाम लूटले, मोगल सैन्य बघ्याची भूमिका घेत होते. नंतर संताजिने महाराष्ट्राची वाट धरली आणि येथेच त्यांचा शोकांतिकेची सुरवात झाली. राजाराम राजांनी आता भावनिक आव्हान केले होते आणि अनेक संताजिचे सैनिक पुन्हा राजरामांस जाउन मिलू लागले. हीच संधी साधून धनाजीने संताजिवर हल्ला केला आणि त्यांचा पूर्ण पाडाव केला. संताजी असह्य होउन आपल्या घराकडे निघून गेला. आता मोगल सैन्य सुद्धा संताजिच्या मागावर होते.सातारच्या प्रदेशात शंभुमहादेवचा डोंगर रांगात संताजिने आश्रय घेतला होता. शंभुमहादेवचा डोंगर रांगात मोगल सैन्य येण्यास कुचरत असे कारण हा प्रदेश घनदाट जंगलांनी वेढ़ला आहे. या अगोदर मराठयानी याच डोंगर रांगात दबा धरून अनेक मोगल सैन्याला कापून काढले होते.संताजिंच्या खुनाच्या अनेक आख्यायिका आहेत. कोणी सांगते की संताजिंस मोगल सरदार लुफ्तलुल्ला खानाने मारले. तर कोणी लिहिते की संताजिंस त्याच्याच माणसाने फितुरिने मारले, काहींच्या मते दवेदारानी मारले असे आहे. पण इतिहास जाणकरांच्या मते त्यांस नागोजी मानेने मारले असे आहे.

! " छावा शिवछञपतीचा संभाजीराजे समाधी स्थळ तूळापूर " !



तुळापुर ला गेल्यावर तिथे भिमा-भामा-इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावरून नावे ने पलीकडील तीरावर जाता येते.नदी पार केल्यावर समोरच्या झाडी झुडपातून वाट काढत पुढे गेल्यावर हे बांधकाम नजरेस पडते. ह्याच ठिकाणी क्रूर औरंग्याने शंभू राजांना साखळ दंडानी बांधून ठेवले होते. याच ठिकाणी त्यांच्यावर अमानुष अत्त्याचार करण्यात आले. इथेच होती त्या औरंगजेबाची छावणी.आणि ह्याच भूमीवर रक्ताभिषेक घातला माझ्या राजानं …. हीच ती भूमी आणि इथलीच झाडे झुडपे ज्यांनी पाहिले माझ्या राजाचे बलिदान…याच ठिकाणी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीभोवती टाकले होते. रात्री येथील गावकऱ्यांनी ते जमा करून तुळापुर आणि वढू येथे गुपचूप पणे त्या तुकड्यांना अग्नी दिला होता.काही वर्षांपूर्वी तिथे शंकराचे मंदिर बांधावे या हेतूने काही जणांनी शंकराची पिंड आणि नंदी ची स्थापना केली होती परंतु काही कर्म दरीद्र्यांनी त्याची हि नासधूस केली. बाजूलाच पडलेली नंदी ची मूर्ती याची साक्ष अजूनही देत आहे.

! " शिवरायांचा दरारा " !



“लंडन गॅझेट”

संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडलामराठ्यांनी जेव्हा सुरतेवर हल्ला चढवला तेव्हा जे पत्र तत्कालीन ब्रिटीश अधिकार्याने त्याच्या वरिष्ठांना लिहिले ते अगदी तंतोतंत मी इथे देत आहे, यावरून आपल्या शिवछत्रपतींचा त्याकाळी मुघलावरती आणि इंग्रजामध्ये असलेला दबदबा लक्षात येईल.. ओळी कमीच आहेत पत्राच्या परंतु अर्थ भलताच मोठा आहे….ते पत्र :-


Two days since we received Letters fromIndia
, written by the English President residingat
Suratte who acquaints us withthe daily fears they have there,
from Sevageethe Rebel,
who having beaten theMogul in several Battels,
 remains almost Master ofthat Countrey


हिंदुस्थानच्या इतिहासात अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक आहे….शिवरायांची अभेद्य नजर कोणाही शत्रूवर पडल्यावाचून कधीही राहिली नाही, भविष्याचा अंदाज शिवरायांनी कधीच ओळखून ठेवला होता हे आपण सर्व जाणताच, शिवछत्रपतींचे मावळे, शिवछत्रपतींचे गनिमी युद्ध, शिवरायांचे अनुमान, शिवरायांचे ध्येय या सगळ्या गोष्टी किमान आपल्या समजण्याच्या पलीकडच्याच होत्या..उपरोक्त पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते कि ज्यांनी हिंदुस्थानावर इतकी वर्षे राज्य केली त्यांच्यामध्ये शिवरायांचा किती दरारा होता..

Thursday, 25 September 2014

! " रायगड शिवराज्यअभिषेकाचा साक्षिदार " !


शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.

! " किल्ले रायगढाचा इतिहास " !



रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.सभासद बखर म्हणते -“राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.”याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर.देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि. हे बघून महाराज खुशीने म्हणाले… तख्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचं महाराजांनी निश्चित केलं. रायगडाच जुनं नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्याची उंची २९०० फुट आहे. गडाला सुमारे १४५० पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडच टकमक टोक श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गड्स्वमिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअर ने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाई चे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटीश काळापासून तेथे श्री शिरकाई चा घरटा हा नामफलक होता.